“भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं”, हसन मुश्रीफांच्या विधानाने ‘खळबळ’
Hasan Mushrif statement : अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी भाजपबद्दल मोठं विधान केले. बिद्री कारखाना निवडणुकीत भाजप आघाडी करणार नाही, कारण ते मला अटक करायला निघाले होते, असं मुश्रीफांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT

Hasan Mushrif : अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुसंख्य नेते भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. भाजपकडून दबाब टाकल्यामुळे अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला, असे दावे शरद पवार आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी केले. पण, आता हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय खळबळ उडाली असून, विरोधकांना आयते शस्त्र मिळालं आहे.
कोल्हापूरमधील बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. सध्या कारखान्याची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के.पी. पाटील यांच्या हातात आहे. त्यांना मुश्रीफ गटाचा पाठिंबा आहे.
हे ही वाचा >> भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप
बिद्री कारखान्याच्या राजकारणात पाटील यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर आहेत. आबिटकर यांना भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांचा पाठिंबा आहे. त्यांच्या पाठिंब्याच्या संदर्भानेच हसन मुश्रीफ यांनी विधान केले.
हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
बिद्री साखर कारखान्याची निवडणूक लागली असून, प्रचार सुरू झाला आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याचे वातावरण तापले असून, एका प्रचार सभेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी एक विधान केले. मुश्रीफ म्हणाले, “या निवडणुकीत भाजप आपल्याबरोबर येईल, असे वाटत नाही. कारण तेच मला तुरुंगात घालायला निघाले होते”, असं मुश्रीफ म्हणाले.