डोक्यात दगड टाकून 28 वर्षीय तरुणाची हत्या, मोबाइलवर बोलण्याच्या वादातून मित्राला संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, बदलापूर: एका 28 वर्षीय तरुणाची निर्जनस्थळ असलेल्या मोकळ्या जागेत डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बदलापुरात उघडकीस आली होती. ही हत्या देखील अत्यंत क्षुल्लक कारणावरुन झाल्याचं आता समोर आलं आहे.

मोबाइलवरून जास्त वेळ बोलण्याच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. समसूल हक गुलाम करीम असे अटक केलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. तर प्रसाद जिंजुरके असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृतक प्रसाद हा बदलापूर पूर्वेकडील सापेगाव परिसरात असलेल्या पोतदार सोसायटीत आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच सोसायटीमध्ये आरोपी समसूलही पत्नी व आपल्या दोन मुलासह राहतो. त्यामुळे दोघांची बऱ्याच वर्षांपासून मैत्री होती. तसंच दोघं मिळून पेंटरचं काम देखील करत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आरोपी मित्राच्या मोबाइलवरून मृत प्रसाद बराच वेळ बोलत होता. त्यावेळेस आरोपीने त्याला माझ्या मोबाइलवरून जास्त बोलू नकोस म्हणून वाद घातला. झालेल्या वादाचा राग समसूलच्या मनात एवढा होता की, त्याने थेट प्रसादचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं.

त्यानंतर समसूलने प्रसादला दारूची पार्टी करण्याच्या बाहण्याने रविवारी रात्रीच्या सुमारास सोबत नेले. तेव्हापासून प्रसाद हा गायब झाला होता आणि आरोपी समसूल फरार होता.

ADVERTISEMENT

दरम्यान, जुवेलीकडून चामटोली गावाकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात प्रसादचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मधील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

ADVERTISEMENT

याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांचा तपास सुरु असतानाच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, घटनेच्या रात्री दोघे मित्र सोसायटीमधून सोबत गेले होते. तेव्हापासून आरोपी देखील बेपत्ता आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली.

Crime: बहिणीचा फोटो काढल्याने राग अनावर, अल्पवयीन मुलाकडून मित्राची हत्या

माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. तेव्हा आरोपी हा आंध्रप्रदेशमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. ही माहिती मिळताच बदलापूर पोलिसांचे एक पथक थेट आंधप्रदेशला रवाना झाले.

मात्र, पोलीस पथक आंध्रप्रदेशला पोहचल्यानंतर आरोपी पुन्हा कल्याणच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकही आंध्रप्रदेशमधून तातडीने कल्याणाला रवाना झालं आणि आरोपीला 72 तासाच्या आत कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

अटकेनंतर आरोपी समसूल यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. ज्यामध्ये त्याने आपला गुन्हा देखील कबूल केला. सध्या बदलापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT