"हॉटेल भाग्यश्री आज बंद...", म्हणून टोळक्याकडून तोडफोड, 70 हजारांचं नुकसान, मालक म्हणाले आता...
या हल्ल्यात हॉटेलचे बॅनर आणि बोर्ड फाडले गेले असून, सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हॉटेल मालक नागेश मडके यांनी दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हॉटेल भाग्यश्रीची टोळक्याकडून तोडफोड

काही तरूणांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Hotel Bhagyashree Dharashiv : “नाद करतो काय?.. यायला लागतंय..” या हटके टॅगलाइनने राज्यभर लोकप्रिय झालेल्या तुळजापूर येथील भाग्यश्री हॉटेलवर रविवारी रात्री अज्ञात टवाळखोरांनी दगडफेक करत तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात हॉटेलचे बॅनर आणि बोर्ड फाडले गेले असून, सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती हॉटेल मालक नागेश मडके यांनी दिली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, हॉटेल बंद असताना 4 ते 5 तरुणांनी ही तोडफोड केल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा >>प्रेयसीने स्वत:ला संपवलं, दारूच्या नशेत प्रियकरानेही चितेत... नागपूरमधील धक्कादायक घटना
हॉटेल भाग्यश्री आज बंद...
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मडके यांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले, “हॉटेल भाग्यश्री आज 10 जून रोजी उघडणार होतं, पण काल रात्री अचानक दगडफेक झाली. बॅनर व बोर्ड फाडले गेले. त्यामुळे हॉटेल काही काळासाठी बंद ठेवावं लागलं. पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पुढील कारवाई सुरू आहे.” मडके यांनी या घटनेमुळे आपल्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे त्यांनी पोलिसांकडे सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिक आणि हॉटेल व्यवसायिकांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.
काही तरूणांनी एक व्हिडीओ शूट करत हॉटेल मालकांना शिवीगाळ केली आहे. हॉटेल बंद असल्याचा राग आल्यानं याच तरूणांनी तोडफोड केल्याची शक्यता आहे.
हल्ल्यामुळे समर्थकांमध्ये संताप...
फक्त 250 रुपयांत भरगच्च मटण थाळी, अनलिमिटेड रस्सा आणि झणझणीत चव यामुळे भाग्यश्री हॉटेलने अल्पावधीतच ग्राहकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. दिवसाला 10 ते 12 बोकड कापले जाण्याइतकी मागणी आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ यामुळे हॉटेलचे नाव घराघरांत पोहोचले. मडके यांनी या यशातून आपल्या पत्नीला 40 ते 50 लाखांची फॉर्च्युनर एसयूव्ही भेट दिल्यानेही ते चर्चेत आले होते. या यशाने प्रेरित होऊन अनेकांनी व्यवसायात उतरण्याचा विचार केला होता. मात्र, या हल्ल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
हे ही वाचा >> पुण्यात डिजिटल अरेस्ट स्कॅमचा कहर; पाच महिन्यांत 9.21 कोटींची फसवणूक, 'हे' लोक टार्गेट
या घटनेचा निषेध करत धाराशिवसह राज्यातील मराठी उद्योजकांनी मडके यांना पाठिंबा दिला आहे. “मराठी माणूस प्रामाणिकपणे व्यवसाय करत असेल आणि त्याच्यावर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर हे वाईट आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया विविध व्यावसायिक संघटनांनी व्यक्त केली. धाराशिव पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून, व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेने तुळजापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, दोषींवर तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.