Impact: ‘मुंबई Tak’ने डोळ्यात अंजन घालणारं वास्तव आणलं समोर, आता ‘सावित्रीच्या लेकीं’साठी हायकोर्टानेच उघडलं दार!

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यातील प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणार वास्तव इंडिया टुडे समूहाच्या ‘मुंबई Tak’ने समोर आणलं होतं. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील खिरखंडी गावातील शिक्षणासाठी मुलींना स्वत: बोट चालवत आणि त्यानंतर जंगलातून वाट तुडवत शाळा गाठावी लागत असल्याचं जळजळीत सत्य ‘मुंबई Tak’ ने मांडलं होतं. आता याच प्रकरणाची दखल स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) घेतली आहे. याबाबत कोर्टाने स्वत: सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे.

या सगळ्या घटनेबाबत कोर्टाने आपल्या संवेदना व्यक्त करताना असं म्हटलं की, ‘सर्वसाधारणपणे विद्यार्थ्‍यांचे आणि विशेषतः मुलींचे दु:ख मांडण्‍यासाठी आमच्याकडे पुरेसे शब्दही नाहीत.’

‘मुंबई Tak’ च्या बातमीची दखल घेत न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एएस किलोर यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला ही याचिका पुढील निर्देशांसाठी योग्य खंडपीठासमोर ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी घेतली जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी आता कोर्ट सरकारला नेमके काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, हायकोर्टाने या प्रकरणी स्वत: याचिका दाखल करुन घेतल्याने आता याबाबत प्रशासनाला देखील योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे.

पाहा हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे:

ADVERTISEMENT

साताऱ्यातील खिरखंडी गावातील मुलींच्या जीवघेण्या प्रवासाबाबत याचिका दाखल करुन घेतल्यानंतर कोर्टाने आपल्या आदेशात असं म्हटलं आहे की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे स्तुत्य उद्दिष्ट तेव्हाच साध्य होईल जेव्हा मुलींसाठी सुरक्षित रस्ता आणि मैत्रीपूर्ण वातावरण उपलब्ध होईल. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या खिरवंडी गावातील मुलांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करू शकते हे सांगण्याची वेगळी गरज नाही.’

ADVERTISEMENT

साताऱ्यातील त्या लहान मुलांच्या विशेषतः मुलींच्या धाडसाचे आणि इच्छाशक्तीचे न्यायालयाने कौतुकही केलं आहे. एवढंच नव्हे तर मुलींच्या धाडसाचं कौतुक करताना कोर्टाला “आम्ही सावित्रीच्या लेकी” या कवितेच्या ओळींचीही आठवण झाली. ज्या त्यांनी आपल्या आदेशात नमूद देखील केल्या आहेत.

“पंखात आता आमच्याही बळ

सिद्ध करण्याची आहे तळमळ

नका करु आता कोणीही रेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी”

असं म्हणत कोर्टाने आता या प्रकरणाची योग्य खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात यावी असे आदेशही दिले आहेत.

हायकोर्टाने दखल घेतलेलं साताऱ्यातील ‘ते’ नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, याच जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. ही या जिल्ह्यातील सत्य परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात खिरखंडी या गावातील मुलींना होडीने प्रवास करुन शाळेत पोहोचावं लागतं. हा त्यांचा रोजचाच दिनक्रम आहे.

कोयना धरणाचा विशाल जलाशय पार करत त्यांना छोटीशी लाकडाची होडी स्वत:च चालवत शाळेत जावं लागतं. हे या‌ मधलं सगळ्या धक्कादायक वास्तव आहे.

खिरखंडी हे गाव जावली तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पात येतं. या गावातील मुलींना रोज होडीतूनच प्रवास करावा लागतो. सकाळी 9 वाजता शाळा सुरु होते. यामुळे सकाळी 8 वाजता या मुलींचा घराजवळून होडीने प्रवास सुरु होतो. सुमारे अर्धा तासाचा होडीचा प्रवास करुन वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करत मुली होडी चालवत कोयनेच्या विशाल जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला घेऊन जातात.

सातारा : डोळ्यात अंजन घालणारं वास्तव! शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा प्रवास, स्वत:च चालवतात होडी

किनारी जाऊन ही होडी थांबवून पुढे त्यांना सुमारे 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. पायी प्रवास करत काट्या कुट्यातुन आणि किर्र जंगलातून मुलींना शाळेत जावं लागतं. सुमारे दीड तासानंतर अंधारी या गावतील शाळेत त्या पोहचतात. एवढ्या खडतर प्रवासानंतरत त्यांना शिक्षणाचे धडे गिरवता येतात.

शाळेसाठी ज्या जंगलातून हे विद्यार्थी चालत जातात तो सगळा भाग हा घनदाट झाडी आणि व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. या जंगलात अस्वल, गवा, बिबट्या, वाघ असे अनेक हिंस्र प्राणी सुद्धा आहेत. त्यामुळे जंगलातून जात असताना हिंस्र प्राण्यांचं सुद्धा या ठिकाणी भय असतं. अशा भीतीदायक वातावरणातून जाऊन या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरु आहे.

गेली अनेक वर्ष या परिस्थितीसोबत झगडून या विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. एवढंच नव्हे तर स्वत:च्या लहान भावंडांना देखील योग्य शिक्षण मिळावं यासाठी त्यांची सुद्धा काळजी घेत या मुली त्यांना सोबत घेऊन हा दररोजचा जीवघेणा प्रवास करत आहे.

राज्यात बहुतेक ठिकाणी कोरोनाच्या भीतीने पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेतच पाठवत नाहीत. मुलांच्या काळजीसाठी राज्य सरकारने काही महिने शाळा बंद केल्या. मात्र, या जावली तालुक्यातील खिरखंडीचे विद्यार्थी कोरोनापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक परिस्थितीत प्रवास करत जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यासाठी धडपडत असल्याचं समोर आलं आहे.

या भागात पावसाळ्यात तर अतिशय मुसळधार पाऊस असतो. अशा पावसाळ्यात तर या गावातील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतात. प्रचंड पाऊस असेल तरी सुद्धा हे विद्यार्थी होडीने प्रवास करुन काट्याकुठ्यांची वाट तुडवत शाळेत जातात.

या सगळ्या परिस्थितीकडे स्थानिक प्रशासन आणि सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोणताही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असतात. मात्र, अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी चाललेली परवड गेली अनेक वर्ष थांबलेली नाही. यांचं शिक्षण सुखकर व्हावं एवढीच साधी अपेक्षा या दुर्गम खेड्यातल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षकांची आहे. या विद्यार्थ्यांची सामाजिक संस्था तसेच शासनाने लक्ष द्यावे. अशी विनंती शाळेचे शिक्षक विनायक पवार आणि गंगाराम पडघे यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील खिरखंडी या दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणासाठी चाललेली जीवघेण्या कसरतीची दखल घेऊन सरकारने त्यांच्या शाळेला जाण्या-येण्याची सोय करावी हीच अपेक्षा या विद्यार्थ्यांनी देखील व्यक्त केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT