
BCCI : नव्या वर्षातील मोहिमांची टीम इंडियाने जोरात तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयची (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) 1 जानेवारी रोजी आढावा बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून झालेल्या वाईट कामगिरीचा पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक झाली. यात महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. महत्त्वाचं म्हणजे विश्व चषकासाठी बीसीसीआयने 20 खेळाडूंची निवड केली आहे. निवड करण्यात आलेले 20 खेळाडू पुढील 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार आहेत. (BCCI's selection of 20 players for the World Cup)
मुंबईत बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बोर्डाचे सचिव जय शाह, कर्णधार रोहित शर्मा, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वरिष्ठ निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा हेही उपस्थित होते.
बीसीसीआयने कोणत्या 20 खेळाडूंची निवड केली आहे, मात्र त्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. परंतु, बोर्डाकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे या 20 खेळाडूंमध्ये असतील अशी माहिती आहे. त्याचबरोबर शुभमन गिलचाही या यादीत समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आता यो-यो चाचणीसोबतच खेळाडूंना डेक्सा चाचणी देखील करावी लागणार आहे. जे खेळाडू दुखापतीनंतर किंवा विश्रांतीनंतर टीम इंडियामध्ये परततील त्यांना हे लागू असणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघाची निवड करताना युवा खेळाडूंना देशांतर्गत सामने खेळावे लागणार आहेत.
निवड करण्यात आलेल्या टीमबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. बीसीसीआयकडून निवड करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, केएल राहुल, उपकर्णधार हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, आणि शार्दुल ठाकूर या 20 खेळाडूंचा समावेश असेल, असं सांगण्यात आहे.