Sachin Vaze प्रकरणाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही-शरद पवार
Sachin Vaze प्रकरणाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसला राम राम करून आलेल्या पी. सी. चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार यांना महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना […]
ADVERTISEMENT

Sachin Vaze प्रकरणाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. आज शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसला राम राम करून आलेल्या पी. सी. चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार यांना महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना या प्रकरणाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
“सचिन वाझे प्रकरणाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र सरकारने हे संपूर्ण प्रकरण उत्तमरित्या हाताळले आहे. तसंच अनिल देशमुख यांनीही हे संपूर्ण प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले आहे. या प्रकरणी दोन तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्यामुळे फारसं भाष्य करणं योग्य ठरणार नाही. “
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
“सचिन वाझे-वरूण सरदेसाई यांच्यातले कॉल रेकॉर्ड NIA ने तपासावे”
सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुख यांचा राजीनाम्याची चर्चा होते आहे असं शरद पवारांना विचारलं असता ही माझ्यासाठी बातमी आहे अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी स्मित हास्य केलं. तसंच हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र सरकारने उत्तमरित्या हाताळलं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर ठाकरे सरकार हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळतं आहे.
सचिन वाझे यांनी यांच्यावर जे काही आरोप झाले आहेत त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्या प्रकरणात फारसं भाष्य करणं योग्य ठरणार नाही. महाराष्ट्र, मुंबई पोलिसांनी चांगलं काम केलं. आता राष्ट्रीय तपास यंत्रणाही यातल्या एका प्रकरणाचा तपास करत आहे त्यामुळे याबद्दल फारसं भाष्य मी करणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
काय आहे सचिन वाझे प्रकरण?
25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्यावर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओ प्रकरणाचे पडसाद थेट महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उठले. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात व्यावसायिक हितसंबंध असल्याची बाबही समोर आली.
मनसुख हिरेन यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमधून नवी माहिती समोर
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विविध आरोप करत सचिन वाझे हेच या प्रकरणात कसे गुंतले आहेत हे दाखवून दिले. तसंच मनसुख हिरेन यांना सुरक्षा मिळावी अशीही मागणी ५ मार्चला केली. त्याच दिवशी दुपारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. यानंतर आणखी आक्रमक झालेल्या फडणवीस यांनी सचिन वाझे हेच या प्रकरणात कसे गुंतले आहेत हे आणखी काही कागदपत्रे, सीडीआर यांचा हवाला देऊन विधानसभेत सांगितलं. हे संपूर्ण प्रकरण NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणीही केली. स्कॉर्पिओचं प्रकरण हे NIA कडे तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आलं आहे. या दोन्ही तपास यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.
१३ मार्चच्या रात्री NIA ने सचिन वाझेंना अटक केली. या अटकेनंतर विविध तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली केली जाईल, गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागेल अशा चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी मात्र हे संपूर्ण प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं आहे असं म्हटलं आहे.
16 वर्ष निलंबन.. तरीही सचिन वाझे का आणि कसे परतलेले मुंबई पोलिसात?