India Pakistan War: मुंबईतील 23 वर्षीय जवान बॉर्डरवर शहीद, पाकिस्तानसोबत लढताना वीरमरण
मुंबईतील घाटकोपरच्या कामराज नगरमधील जवान मुरली नाईक यांना भारत-पाक संघर्षात वीरमरण आल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कामराज नगरचे रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील जवान मुरली नाईक (वय 23 वर्ष) यांनी आज (9 मे) पहाटे 3 वाजता भारत-पाकिस्तान सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीत आपल्या प्राणांची आहुती देत वीरगती प्राप्त केली. शहीद जवान मुरली नाईक यांचे पार्थिव अंत्यविधीकरिता त्यांच्या मूळ गावी उद्या (10 मे) सायंकाळी आणण्यात येणार आहे. अशी माहिती पंजाब येथील लष्कराच्या कार्यालयातून कळविण्यात आली आहे.
कोण आहेत मुरली नाईक?
मुरली नाईक हे घाटकोपर (पूर्व) येथील कामराज नगरमधील श्रीराम नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र होते. मुरली नाईक हे 2022 साली भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांची ट्रेनिंग देवळाली, नाशिक येथे झाली होती. ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते. त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्यावर पाठविण्यात आले होते. त्याच दरम्यान ते शहीद झाले.
बॉर्डरवर नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरील माहितीनुसार, 9 मे 2025 च्या पहाटे भारत-पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या संघर्षादरम्यान झालेल्या चकमकीत मुरली नाईक हे शहीद झाले. दरम्यान, या घटनेबाबत लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु स्थानिक कार्यकर्ते आणि सोशल मीडियावरील पोस्ट यावरून ही माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा>> IPL 2025 Suspended: अजिबात नाराज व्हायचं नाही, IPL चाहत्यांसाठी आता BCCI कडून मोठी घोषणा!
मुरली नाईक यांचं संपूर्ण कुटुंब हे घाटकोपरमधील कामराज नगर येथील वस्तीत राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच येथे नव्याने इमारती उभारण्याचं काम सुरू झाल्याने मुरली नाईक यांचं कुटुंब काही काळापुरतं आंध्र प्रदेशमधील आपल्या मूळ गावी राहण्यासाठी गेलं होतं. तर मुरली नाईक हे मात्र, लष्करात कर्तव्यावर होते.