
Pegasus स्पायवेअरवरून सध्या देशात राजकारण तापलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस यामुळे वादळी ठरले. अशातच शिवसेनेने सामना अग्रलेखातून पेगॅससचा हल्ला हा केंद्राच्या संमतीशिवाय होऊच शकत नाही. हा हल्ला आणीबाणीपेक्षा भयंकर आहे, याचे खरे बाप हे आपल्याच देशात आहे, त्यांना शोधा असं म्हणत अमित शाहा-नरेंद्र मोदी जोडीवर हल्ला चढवला आहे.
पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार? या सर्व प्रकरणाची चौकशी ‘जेपीसी’ म्हणजे संयुक्त संसदीय समितीने करावी ही पहिली मागणी. नाही तर सर्वोच्च न्यायालयाने ‘स्यु मोटो’ दाखल करून घेऊन स्वतंत्र चौकशी समिती नेमावी. त्यातच राष्ट्रहित आहे. पण राष्ट्रहित, राष्ट्राची इभ्रत याची फिकीर खरेच कोणाला पडली आहे काय? देश एका अंधाऱ्या गर्तेत सापडला आहे. मूठभर लोक आणीबाणी लादल्याचा काळा दिवस प्रतिवर्षी साजरा करीत असतात. ‘पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. ‘पेगॅसस’चे खरे बाप आपल्याच देशात आहेत, त्यांना शोधा, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
इस्त्राइल हा भारताचा मित्रदेश आहे असं आपण समजत होतो. पंतप्रधान मोदी यांच्या काळात ही मैत्री अधिकच घट्ट झाली. अशावेळी ‘पेगॅसस’ या हेरगिरी करणाऱ्या ऍप्सने आपल्याकडील दीड हजारावर प्रमुख लोकांचे फोन चोरून ऐकल्याचे प्रकरण समोर आले आहे. राहुल गांधी यांच्यासह अनेक उद्योगपती, राजकारणी, पत्रकार अशा लोकांचे ‘फोन टॅप’ करण्यात आले. व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावर हा सरळ हल्ला आहे असं म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
जगातील सगळय़ात मोठ्या लोकशाहीत हे घडले. आपले गृहमंत्री श्री. शहा सांगतात, "देशाला आणि लोकशाहीला बदनाम करण्याचे हे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे!” गृहमंत्र्यांनी हे विधान करावे हे आश्चर्यच आहे. देशाला बदनाम नक्की कोण करीत आहे, हे श्रीमान गृहमंत्री सांगू शकतील काय? सरकार तुमचे, देश आणि लोकशाही तुमची. मग हे सर्व करण्याची हिंमत कोणात निर्माण झाली आहे?, असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आलाय.