Money Laundering Case: शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीचं समन्स, 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता अंमलबजावणी संचलनालयाने (ED) त्यांना समन्स बजावलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ईडीने भावना गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कालच (28 सप्टेंबर) भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.

दरम्यान, भावना गवळी यांना जरी ईडीने समन्स बजावलेलं असलं तरी त्या या समन्स स्वीकारुन चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांचे विश्वासू सहकारी सईद खान यांना आधीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अशावेळी भावना गवळी यांना देखील चौकशीला बोलावल्याने त्यांच्यावर ईडी काही कारवाई करु शकते का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

भावना गवळी यांना का बजावण्यात आलं आहे समन्स?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भावना गवळी यांच्या आईसह सईद खान हे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक होते. 2019 मध्ये या संस्थेला फर्ममध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यापूर्वी ट्रस्ट होती. या ट्रस्टमध्ये स्वतः भावना गवळी आणि त्यांची आई शालिनीताई या सदस्य होत्या. ट्रस्टचे रुपांतर फर्ममध्ये करत असताना धर्मादाय आयुक्तालयात फसवणूक केली गेली असल्याचा ईडीला संशय आहे. त्याचबरोबर फर्मचा वापर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी केल्याचाही संशय आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भावना गवळी यांच्याशी संबंधित या ट्रस्टच्या व्यवहारात 17 कोटींची अनियमितता आढळून आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश सारडा यांचा आरोप आहे की, भावना गवळी यांनी बालाजी सहकारी पार्टिकल मंडळाच्या माध्यमातून 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन राष्ट्रीय सहकारी विकास परिषदेची फसवणूक केली आहे. भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून दहा वर्षांसाठी पैसे घेतले होते. पण प्रत्यक्षात कंपनी सुरूच केली गेली नाही,’ असा सारडा यांनी केलेला आहे. याच प्रकरणी आता ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय आहे?

ADVERTISEMENT

बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखाना हा पार्टिकल बोर्ड चे पार्ट तयार करण्यासाठी निर्मिण्यात आला. हा कारखाना वाशिमच्या शिरोडमध्ये आहे.

हा कारखाना 1992 मध्ये पुंडलिक रामजी गवळी यांनी सुरू केला. पुंडलिक गवळी हे भावना गवळी यांचे वडील आहेत. भावना गवळी या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. या फॅक्टरीला नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थातत NCDC ने भांडवल दिलं. तसंच राज्य सरकारनेही मिळून यामध्ये 55 कोटींची गुंतवणूक आहे.

इतकं सगळं होऊनही आश्चर्याची बाब ही आहे की हा कारखाना कधी सुरूच झालाच नाही. या कारखान्यात कुठलंही उत्पादन न होता हा कारखाना तोट्यात गेला असं दाखवण्यात आलं आहे.

या कारखान्यासाठी जे साहित्य मागवण्यात आलं त्याचे दर डोळे विस्फारणारे आहेत. खासरून बाहेरून आयात करण्यात आलेल्या मशीनच्या किंमती या कोड्यात टाकणाऱ्या आहेत.

या कारखान्यावर झालेला सगळ्यात आलेला आरोप हा आहे की या कंपनीचं बाजारमूल्य हे 55 कोटी असताना या कारखान्याचं अवमूल्यांकन करण्यात आलं आहे. 7 कोटी 9 लाख 90 हजार इतकं कमी मूल्य या कारखान्याचं दाखवण्यात आलं. हे अवमूल्यांकन पुण्यातील MITCON कंपनीने केलं आहे.

भावना अॅग्रो या कंपनीने बालाजी कारखाना लिक्विडेटर बोर्डाला फक्त 25 लाख रूपये दिले होते. 2010 मध्ये झालेल्या व्यवहारानंतर आज पर्यंत बालाजी कारखान्याच्या लिक्विडेटर बोर्डाकडे आजपर्यंत 6.9 कोटी रूपये येणं आहे. बालाजी कारखान्याच्या लिक्विडेटर बोर्डाने रिसोड क्रेडिट सोसायटीने मंजूर केलेल्या गॅरंटीची मागणी केली नाही. भावना अॅग्रोकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी कोणतं पाऊलही उचललेलं नाही. गैरव्यवहाराचा दुसरा भाग असा की की क्रेडिट सोसायटीने या व्यवहारासाठी मंजूर केलेली बँक गॅरंटी वसू केली नाही.. किंवा रद्दही केली नाही.

किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले आहेत?

भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून 18 कोटी रुपये काढलेले आहेत. त्यात सात कोटीं चोरीला गेल्याची तक्रार दिलीये. केंद्र सरकारचे 44 कोटी 11 कोटी रुपये स्टेट बँकेचे आहेत. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना 55 कोटींत उभारण्यात आला आणि भावना अॅग्रो लिमिटेडने फक्त 25 लाखांत तो खरेदी केला.

भावना गवळींचे सहकारी सईद खान आहेत तरी कोण? जाणून घ्या…ईडी कारवाईनंतर चर्चेला उधाण

शिवसेनेचे नेते ईडीच्या रडारवर

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांची कालच ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. दुसरीकडे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे देखील ईडीच्या रडारवर आहे. तर आता शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना आता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावण्यात आलं आहे. यामुळे शिवसेनेचे नेते ईडीच्या रडारवर आल्याचं सध्या चित्र दिसतं आहे. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले असून त्याचा तपास सध्या ईडीकडून केला जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT