Shiv Sena Yashwant jadhav: मुंबई महापालिकेच्या ‘वजिरा’ला शह देऊन ‘राजा’ होणार चेकमेट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi Govt) पक्षांवर एका मागून एक राजकीय संकटं ही येतच आहेत. त्यातच आता आगामी मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला (Shiv Sena) अडचणीत आणणारी बातमी कालच (17 ऑगस्ट) समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्यावर आयकर विभागाने (Income Tax Department) केलेले गंभीर आरोप. याच आरोपातून आता कुठेतरी थेट शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांच्यावर आयकर खात्याने अत्यंत गंभीर असे मनी लाँड्रिंगचे आरोप केले आहेत. यामुळे यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी आयकर खात्याने केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेना आमदार यामिनी जाधव या मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे अत्यंत महत्त्वाचे असे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या पत्नी आहेत. ज्या सध्या आयकर खात्याच्या रडारवर आल्या आहेत.

ADVERTISEMENT

हेच यशवंत जाधव हे गेली सतत तीन वर्ष मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. मुंबई महानगरपालिका आणि स्थायी समिती ही ठाकरे कुटुंबीयांसाठी आणि शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

ADVERTISEMENT

1997 सालापासून सतत शिवसेनेची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर राहिली आहे. अनेकदा विरोधकांकडून असे आरोप करण्यात आले आहेत की, ठाकरे परिवाराकडे मुंबई महापालिकेच्या नाड्या आहेत. याच मुंबई महापालिकेतील स्थायी समिती ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते.

त्याच स्थायी समितीचे अध्यक्ष हे यशवंत जाधव हे आहेत. त्यामुळे आतआ यशवंत जाधव यांना शह देऊन थेट मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा तर विरोधकांचा प्रयत्न नाही ना? अशा चर्चेला सुरुवात झाली आहे.

विधानसभेचं तिकीट नाकारुन स्थायी समितीवरच राहणं यशवंत जाधवांनी केलं होतं पसंत

खरं म्हणजे यशवंत जाधव यांनी 2019 साली विधानसभेचं तिकीट नाकारून स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरच राहणं पसंत केलं होतं. त्यांनी स्वत: विधानसभेत जाण्याऐवजी आपल्या पत्नीला आमदार म्हणून निवडून आणलं होतं.

यशवंत जाधवांच्या पत्नी यामिनी जाधव का आल्या आयकर खात्याच्या रडारवर?

आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आयकर खात्याला यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या अॅफिडेबिटमध्ये काही विसंगती आढळून आल्या आहेत. आता यामिनी जाधव यांच्या अॅफिडेबिटमध्ये काय आढळलं होतं? तर.. त्यामध्ये असं म्हटलं होतं की, त्यांच्यावर 1 कोटीचं कर्ज आहे. ते कर्ज अनसिक्युरिड लोन होतं. म्हणजेच त्या बदल्यात तुम्ही काहीही तारण ठेवलेलं नाही.

दरम्यान, जेव्हा आयकर खात्याला यामिनी जाधव यांच्याकडे अनसिक्युरिड लोन दिसून आलं तेव्हा आयकर खात्याने त्याची चौकशी सुरु केली. त्यानंतर त्यांना असं आढळून आलं की, जाधव यांच्या कुटुंबीयांचे स्वत:चेच पैसे जवळजवळ 14 कोटी हे दुसऱ्यांच्या नावे आपल्या स्वत:कडे फिरवून घेतले.

जे कर्ज म्हणून दाखविण्यात आले. यालाच मनी लाँड्रिंग असे म्हणतात. असा आरोप आयकर खात्याने केला आहे. याच मुद्द्यावरुन आयकर विभागाने यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे.

जर ही चौकशी पुढे अशीच चालू राहिली तर यावेळी स्थायी समितीली काही गोष्टींची देखील चौकशी होऊ शकते. तसंच महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अशा पद्धतीची चौकशी सुरु झाली तर या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं.

कारण की, याप्रकरणी आयकर विभागाने आता जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. काही जणांचे जबाब नोंदविण्यात देखील आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जर ही चौकशी सुरु राहिली तर त्यामुळे येत्या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची दाट शक्यता आहे.

‘वर्षा’वर हाय व्होल्टेज बैठक सुरु

‘मातोश्री’च्या जवळचे अशी यशवंत जाधव यांची ओळख आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मातोश्री आणि सरकार असे दोघेही अॅक्टिव्ह झालेले आहेत.

कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’वर यशवंत जाधव यांना बोलावलं आहे. त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री वळसे-पाटील आणि अनिल परब देखील आहेत आणि त्यांच्यात एक बैठकही सुरु आहे.

शिवसेना नेत्या यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात?; आयकर विभागाच्या मागणीने खळबळ

ज्या पद्धतीने ही उच्चस्तरीय बैठक सुरु झाली आहे त्यानुसार सरकारच्या हे लक्षात आलं आहे की, हे प्रकरण एवढं सोप्प नाही. यामिनी जाधव यांच्याबाबतची चौकशी एवढ्या पुरतंच हे प्रकरण सीमित राहणार नाही. याची सरकारला लागलीच जाणीव झाल्याने आता महाविकास आघाडीने देखील याबाबत पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

यशवंत जाधव किंवा यामिनी जाधव यांच्यावरील आरोप इथवरच ही गोष्ट मर्यादित राहणार नाही. हे प्रकरण सरकारपर्यंत येऊ शकतं ही गोष्ट लक्षात घेऊन शिवसेनेने आता याला तोंड देण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेतील काही नेते जे ‘मातोश्री’च्या जवळ आहेत त्या नेत्यांना टार्गेट करुन त्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना किंवा सरकारला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

या प्रकरणात थेट एखाद्या केंद्रीय एजन्सीने एखाद्या आमदारावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर अशा पद्धतीने आरोप लावलेले आहेत. त्यामुळे जर मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेनेच्या आणि विशेषत: मातोश्रीच्या जवळ असणाऱ्या नेत्यांवर कारवाई झाली तर ती गोष्ट शिवसेनेसाठी खूपच नाचक्की करणारी ठरु शकतं.

म्हणजेच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वजिराला शह देऊन राजाला चेकमेट करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? अशी चर्चा मात्र राजकीय नेत्यांमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT