डोळ्यात अश्रू, काळजात राग घेऊन परीक्षा दिली, वैभवीनं 12 वीला किती टक्के मिळवले?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. अशातच संतोश देशमुख यांच्या लेकीन घवघवीत यश मिळवत दुख:चा डोंगर सर केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 5 मे 2025 रोजी आज जाहीर झाला आहे.

संतोष देशमुखांची लेक वैभवी देशमुखचं घवघवीत यश
Vaibhavi Deshmukh Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये कोकणानं घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कोल्हापूरचा दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. तर चौथ्या क्रमांवर मराठवाड्यातील संभाजीनगरचा क्रमांक आहे. या टॉपर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकीकडे या सगळ्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे मराठवाड्यातील बीडमधील मस्साजोगच्या संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखचंही मोठं कौतुक होतंय. कारण एवढा मोठा दु:खाचा डोंगर कोसळेलला असतानाही वैभवीनं घवघवीत यश मिळवलंय.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे सगळं राज्य हळहळलं होतं. पण अशा परिस्थितीतही लेक वैभवीनं इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत आभाळाला गवसणी घालणासारखं काम केलं आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांचं लक्ष्य हे वैभवीच्या निकालाकडं लागलं आहे. वैभवीला बारावी बोर्डाच्या निकालात 85.33 टक्केवारी मिळाली आहे.
हेही वाचा : HSC Result 2025 : 12 वीचा विभागनिहाय निकाल जाहीर, कोकण आणि पुण्याचा नंबर कितवा?
वैभवी माध्यमांना बोलताना वारंवार सांगायची, की माझ्या वडिलांची इच्छा होती मी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. संतोष देशमुख यांना हाल-हाल करुन मारलं, कुटुंब उध्वस्त झालं, डोक्यावरचं छत्र हरवलं, कुटुंबच नाही, तर अख्ख गाव रडत होतं, राज्य हळहळ व्यक्त करत होतं. आनंदानं जगायच्या वयात वैभवीला बापाच्या न्यायाच्या लढ्यासाठी झटावं लागलं. रनरन फिरावं लागलं, विनंत्या अर्ज करावे लागले. एवढ्या मोठ्या वादळातही वैभवीनं धीर धरला, परीक्षा दिली आणि बारावीच्या परीक्षेत सायन्समधून तब्बल 85.13 टक्के गुण मिळवले. त्यामुळे सध्या तिचं कौतुक होतंय.
हेही वाचा : HSC 12th Result 2025 : दुपारी 1 वाजता लागणार बारावीचा निकाल, अशी डाऊनलोड करा तुमची मार्कशीट
बारावीच्या निकालानंतर वैभवी देशमुख नेमकं काय म्हणाली?
जी मानसिकता होती.. म्हणजे आम्ही खूप नैराश्यात होतो. कारण माझ्या वडिलांची खूप निर्घृण हत्या झाली. त्याचं दु:ख आम्हाला खूप होतं. आम्ही स्वप्नात देखील अशा दु:खाचा विचार केलेला नव्हता. मला या परीक्षेत 85.33 टक्के मार्क आहेत.आज मला खंत या गोष्टीची वाटते की, सर्वजण माझ्यासोबत आहेत. पण माझे वडील माझ्यासोबत नाहीत. त्यांच्या कौतुकाची थाप आज माझ्या पाठीवर पडणार नाही. आजच नाही, तर इथून पुढे देखील माझ्या पाठीवर कधीच पडणार नाही.
माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा
ज्या लोकांनी माझ्यापासून, कुटुंबापासून हिरावून घेतलंय त्या लोकांना लवकरात लवकर फाशी द्यावी. आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडलंय. आमचे निर्णय हे थांबलेले आहेत. त्यामुळे माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा. माझ्या वडिलांच्या हत्येतील एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घ्यावं. माझी NEET ची तयारी सुरू होती. पण काल झालेल्या त्या परीक्षेत माझे गुण कमी आले. पण मला माझ्या वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहे.