
राकेश गुडेकर, रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावर आज (17 मे) पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या क्वॉलिस कारचा खेड येथे भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक किशोर चव्हाण (वय 48 वर्ष, रा. धामापूर संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.
खेड तालुक्यातील खवटी रेल्वे ब्रिजजवळ हा भीषण अपघात झाला. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या क्वॉलिस गाडी क्रमांक (MH.04.BN.4193) वरील चालक किशोर चव्हाण यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या साईडला उभ्या असणाऱ्या आयशर गाडीला (MH.08.AP.6996) मागून धडक दिली. या भीषण अपघातामध्ये क्वॉलिस गाडीवरील चालक किशोर चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले.
दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यामध्ये बोडकर, समेल सुर्वे आदी पोलीसांचा समावेश होता.
या अपघातात क्वॉलिस गाडीमधील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये कुमारी सनम संदीप चव्हाण (वय 12 वर्षे) हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर हर्षदा किशोर चव्हाण (वय 40 वर्षे) यांच्या देखील डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याशिवया संतोष आबाजी चव्हाण (वय 55 वर्ष) कुमारी रितिका केशव चव्हाण (वय 16 वर्ष) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
तर सार्थक किशोर चव्हाण (वय 14 वर्ष), स्मिता संतोष चव्हाण (वय 50 वर्षे), स्नेहा सुरज कर्वे (वय 28 वर्षे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या या सगळ्या जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार चालू असल्याचे समजते आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. मात्र, आता वाहतूक पूर्ववत झाली आहे.
दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी आता चौकशी देखील सुरु केली असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.