‘पहिले तू सुधार, लोकांचं काय पाहतो’; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांत खैरेंवर पलटवार
मनीष जोग : जळगाव एकनाथ शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार येणाऱ्या निवडणुकीत नाही पडले तर मी हिमालयात जाईन, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. यावर आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, तुम्ही स्वतः निवडून आले नाही. एमआयएमने तुम्हाला पाडून […]
ADVERTISEMENT

मनीष जोग : जळगाव
एकनाथ शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार येणाऱ्या निवडणुकीत नाही पडले तर मी हिमालयात जाईन, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. यावर आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, तुम्ही स्वतः निवडून आले नाही. एमआयएमने तुम्हाला पाडून टाकलं. पहिलं तू सुधर, लोकांचं काय पाहतो, अशा एकेरी शब्दात उल्लेख करत चंद्रकांत खैरेंवर जोरदार पलटवार केला.
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात दिवसंदिवस एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. दररोज आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या जात आहे. एकमेकांच्या हाडवैऱ्याप्रमाणे शाब्दिक हल्ले सुरु आहेत.
दोन्ही गटात व्हिडीओ वॉर सुरु
सध्या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटात चांगलंच वाद पेटलं आहे. सध्या व्हिडीओ वॉर देखील दोघांमध्ये पाहायला मिळत आहे. एकमेकांचे जुने विधानं शेअर करून निशाणा साधला जात आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी पूर्वी भाजपवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ तर उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. बाळासाहेबांचे देखील काही विधानं सोशल मीडियावर टाकून टीका केली जात आहे. तर माजी खासदार चंद्रकांत खरे हे देखील एकनाथ शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात कधीकाळी सहकारी असलेले गुलाबराव पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर देत टीका केली आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?
“उद्धव ठाकरेंना मुद्दाम त्रास देण्यासाठी दसरा मेळावा घेऊन मोठा खर्च केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी त्यांना महत्वाची खाती दिली. ज्यांनी मोठं केलं त्यांना आपण विसरायचं नसतं. जनता यांना माफ करणार नाही, त्यामुळं हे पन्नासच्या पन्नास आमदार नाही पडले ना माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. पन्नासच्या पन्नास लोक नाही पडले तर मी हिमालयात जाईन. कारण हा शाप आहे जगदंबेचा. जनतेला गद्दारी आवडत नाही. आत्तापर्यंत शिवसेनेतून जेवढे निवडून गेले ते कधीही निवडून आले नाहीत” अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.