
Devendra Fadnavis plan is ready: नागपूर: राज्याच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला 19 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, त्याच्या पूर्वसंध्येलाच राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक सीमावादावर केवळ राजकारण करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ज्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचं विधान केलंय. शिवाय या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला खिंडीत गाठण्याऐवजी सरकारच विरोधकांना बॅकफूटवर ढकलेल अशी रणनिती खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आखल्याचं पाहायला मिळतंय. (devendra fadnavis plan is ready it will put opposition in trouble maybe big secret explosion in assembly)
फडणवीसांच्या हाती कोणती माहिती?
आतापर्यंत आपण अनेकदा पाहिलं आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा अतिशय योग्यरितीने वापर करुन घेतला आहे. विधानसभेच्या पटलावर अधिकृतपणे योग्य माहितीच्या आधारे फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला नामोहरम केलं होतं. आता ते स्वत: सत्तेत आल्यानंतरही अशाच पद्धतीने विरोधकांना खिंडीत गाठणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विरोधक हे आक्रमक आहेत. ज्याचा प्रतिकूल परिणाम हा सरकारच्या इमेजवर होऊ शकतो. अशावेळी विरोधकांनी कोणतंही डॅमेज करण्याआधीच आपल्या सरकारला सुरक्षित करण्याचा मास्टर प्लॅन फडणवीसांनी तयार केला आहे.
विरोधकांनी सीमावादावरुन सभागृहात सरकारला मागे रेटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस आधीपासूनच सगळं प्लॅनिंग केल्याचं पाहायला मिळतंय. ज्याचा उल्लेख त्यांनी आज (18 डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले
'सीमा प्रश्नाच्या संदर्भात जणू काही हे सरकार आल्यावरच सीमा प्रश्न सुरु झाला अशाप्रकारे जे बोललं जातंय. खरं तर जतच्या गावांनी आम्हाला कर्नाटकात जायचंय असा ठराव 2013 साली केला. जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा केलेलं. त्यानंतर 2016 साली 77 गावांना आपण पाणी पोहचवलं. उर्वरित गावांना पाणी पोहचवण्याचं काम एकनाथ शिंदे करतायेत. पण एक गोष्ट लक्षात आली आणि इंटेलिजन्सच्या रिपोर्टमध्ये ती क्लिअर कट दिसते की, आता काही गावांमध्ये.. कोणी म्हणालं आम्हाला गुजरातमध्ये जायचंय, कुणी म्हणालं आम्हाला आंध्राला जायचं आहे. हे जे काही सूर उमटले आहेत हे सूर उमटवणारे कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आहेत याची सगळी माहिती आमच्याकडे आलेली आहे.'
'योग्य वेळी ती माहिती सभागृहासमोर देखील आम्ही आणू. पण काही पक्षाचे नेते जाणीवपूर्वक महाराष्ट्रात ही भावना पेटवतायेत. एकीकडे इतर राज्यात सगळे पक्ष एकत्रित येऊन सीमावादाचा प्रश्न उचलतात आणि इथे मात्र अतिशय हीन दर्जाचं राजकारण करण्याकरिता काही पक्षाचे पदाधिकारी बैठका घेऊन त्याठिकाणी आपण मागणी करुया आपण दुसऱ्या राज्यात जाऊयात. अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवतात. हे कदाचित अजित पवारांच्या लक्षात आलं नसेल तर ती नावं आम्ही त्यांनाही पाठवू.' असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.
त्यामुळे आता विरोधक या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतात की फडणवीसांच्या मास्टर प्लॅनसमोर कमकुवत पडतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.