Vidhan Parishad Election Results update : मोठी बातमी.. विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणूक निकालाचा सस्पेन्स वाढला आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसनं भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला आहे. तशी तक्रार काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे केली असून, विधान परिषदेचा निकाल येण्यास रात्री उशीर होण्याचीच शक्यता आहे. मात्र, मतमोजणी लांबल्यामुळे या निकालाकडे लक्ष लागलेल्या सगळ्यांचीच उत्सुकता आणखी वाढली आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील सर्वात मोठा उलटफेर:

भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे विजयाच्या उंबरठ्यावर. तर काँग्रेसचे भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या पसंतीच्या मतामध्ये कोटा पूर्ण करता आलेला नाही. काँग्रेसची काही मतं फुटली असल्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांच्या रणनितीला मोठं यश

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी

विधान परिषद निवडणुकीत सचिन आहिर, आमशा पाडवी, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, उमा खापरे आणि प्रविण दरेकर विजयी.

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीतील एका मतावर भाजपने घेतला आक्षेप

ADVERTISEMENT

285 पैकी 1 मत बाजूला ठेवण्यात आलं. 284 मतं ठरवणार नेमका निकाल. रामराजे निंबाळकर यांच्या कोट्यातील हे एक मत असून ते बाजूला ठेवण्यात आलं आहे. हे मत बाद करण्यात आलेलं नाही.

एकीकडे विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच दुसरीकडे ईडीने शिवसेनेला धक्का दिला आहे. ईडीने शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. गेल्या आठवड्यात परबांना दापोली रिसॉर्ट प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. पण ते पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ईडी समोर हजर झाले नव्हते.

विधान परिषद निवडणूक निकालाचे प्राथमिक कौल समजताच सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवन परिसर घोषणांनी दणाणून सोडला. एकनाथ खडसे समर्थकांनी टरबूज आणून परिसरात फोडले आहेत.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणी खोळंबली होती. अखेर मतमोजणी सुरू झाली असून, आता निकालाची धाकधूक सुरू झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीत आपापले उमेदवार जिंकून आणण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने केलेली रणनीती आता समोर आलीये. भाजपने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच पहिल्या चार उमेदवारांना सुरक्षित करण्यासाठी पहिल्या पसंतीची ३० मते दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

भाजपप्रमाणेच शिवसेनेनं त्यांच्याकडे ६४ मतं असल्याचा दावा केलाय. शिवसेनेनंही दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ३० मतं उमेदवारांना दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची २८/२९ अशी मतं दिली असल्याची माहिती समोर आलीये.

“विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील. आज कोणी पावसात भिजले तरी त्याचा परिणाम होणार नाही. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल. अपक्ष हे भाजपच्याच बाजूने राहतील. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्षांची कितीतरी वेळा अब्रु घालवली आहे. त्यामुळे अपक्षांची नाराजी मतदानातून निश्चितरित्या उमटेल,” असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचा दोन मतांवर आक्षेप…

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या दोघांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. याप्रकरमी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल आहे..

विधान परिषद निवडणुकीमुळे अजित पवारांचा दौरा रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज देहू दौऱ्यावर होते, मात्र विधान परिषद निवडणुकीमुळे अजित पवारांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. दुपारी देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या प्रस्थान सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत २७६ आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. आता मोजकेच आमदार मतदान करण्याचे शिल्लक राहिले आहेत. मतदान पूर्ण झाल्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरूवात होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदानाची वेळ संपत असतानाच निकालाबद्दलची धाकधूकही वाढली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत २४६ आमदारांचं मतदान पार पडलं आहे. तीन तासानंतर मतदानाची वेळ संपणार असून, आमदारांना सूचना केल्या जात आहे.

बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवि राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची विधान भवन परिसरात भेट झाली. मतदानापूर्वी दोन्ही नेत्यांची भेट झाली. भेटीनंतर रवि राणांनी यावेळीही हनुमान चालीसा घेऊनच मतदान करायला जाणार असल्याचं सांगितलं.

भाजप आणि महाविकास आघाडीला लागणारी जास्तीचं मतं

विधान परिषद निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजता मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. पहिल्या तीन तासांत विधान परिषद निवडणुकीसाठी 203 आमदारांनी मतदान केलं आहे. शिवसेनेकडून आमदारांना मतदान करण्याबद्दल सूचना करण्यात आल्या असून, मतदानानंतर थांबण्याची सूचना देण्यात आली आहे.

अनिल देशमुख, नवाब मलिकांची सुप्रिम कोर्टात धाव; मतदानाला परवानगी मिळणार?

राज्यसभा निवडणुकीवेळी गैरसमज निर्माण झाले होते, पण यावेळी महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार. कुणीही महाविकास आघाडीचा उमेदवार पाडू शकणार नाही, असा विश्वास अपक्ष आमदार देवेंद्र भूयार यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणुकीत भूयार यांनी मतदान केला नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी राऊतांची भेट घेतली होती.

क्षितिज ठाकूर मुंबईत दाखल

राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळेच तीन मतांसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडे गेला आठवडाभर त्यांच्याकडे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, त्यांचे सुपुत्र आणि आमदार क्षितिज ठाकूर हे परदेशवारीवर गेले होते. ते मतदानाला येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, क्षितिज ठाकूर मतदानाच्या दिवशी सकाळी मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे.

मतदान कसं करायचं? फडणवीसांनी दिले धडे

विधान परिषद निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान केलं जातं. त्यामुळे मतदान करताना आमदारांना काळजी घ्यावी लागते. मतदान करताना चूक झाली, तर मतदान बाद ठरत आणि त्याचा फटका पक्षाचा उमेदवाराला बसण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वच पक्षांकडून आमदारांना मतदान करण्याबद्दलचे नीट धडे दिले गेले. मतदान सुरू झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना त्यांच्या कक्षात मतदान करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.

विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सक्रियपणे काम करताना दिसत आहे. विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांशी बोलणार आहेत. शिवसेना आमदारांचे पाच गट तयार करणार आहे. शिवसेना आमदारांचं मतदान अजून बाकी आहे.

मतदान सुरू झाल्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत ६८ आमदारांनी मतदान केलं.

विधान परिषद निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजता मतदानाला सुरूवात झाली. पहिल्या तासाभरात भाजपच्या ५० आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. सर्वात आधी भाजपचेच आमदार विधान भवनात दाखल झाले होते. हळूहळू आमदार मतदानासाठी विधान भवनात येत आहेत.

भाई जगताप की एकनाथ खडसे?

विधान परिषदेसाठी दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. दहावी जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपला बाहेरच्या मतांची गरज लागणार आहे. दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी काँग्रेसला बाहेरच्या मतांची मदत घ्यावी लागणार आहे.

भाजपलाही पाचव्या उमेदवारांसाठी जास्तीची मतं मिळवावी लागणार आहेत. असं असतानाच राजकीय वर्तुळात भाजपकडून भाई जगताप नाही, तर एकनाथ खडसे यांना पराभूत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपच्या निशाण्यावर कोण आहे हे कळण्यासाठी निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

विधान परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा का होतेय ? काय आहे राजकारण?

चार पक्षांनी कुणाला ठेवलंय पोलिंग एजंट?

काँग्रेस – अस्लम शेख, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमर राजूरकर.

राष्ट्रवादी काँग्रेस – प्राजक्त तनपुरे, अनिल पाटील, संजय बनसोडे.

भाजप – संजय कुटे, अतुल भातखळकर, रणधीर सावरकर, आशिष शेलार, राहुल नार्वेकर.

शिवसेना – विलास पोतनीस, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभू.

लक्ष्मण जगताप यांची प्रकृती बरी नाही. ते आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी एका खासगी कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईकडे सकाळी आठ वाजता रवाना झाले. लक्ष्मण जगताप यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय आणि डॉक्टरांचं पथक असणार आहे. सकाळी आठ वाजता पिंपरी-चिंचवडवरून निघालेले लक्ष्मण जगताप अकरा वाजता विधी मंडळात पोहोचणार आहेत.

हितेंद्र ठाकूर कुणाच्या पाठिशी?

बहुजन विकास आघाडीचे नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूर विधान परिषद निवडणुकीत कुणाला साथ देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. बहुजन विकास आघाडीची तीन मतं असून, या मतांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी भेटी घेतल्या. त्यामुळे हितेंद्र ठाकूर नेमकं कुणाच्या पाठिशी उभं राहणार निकालातूनच कळणार आहे.

आघाडी की, भाजप… विधान परिषद निवडणुकीत कुणाचा ‘कार्यक्रम’ होणार?, आकडे काय सांगतात?

टिळक, जगताप बजावणार मतदानाचा अधिकार

दीर्घकाळापासून आजारी असलेले दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप मतदान करणार आहेत. दोघांनाही गंभीर आजाराने ग्रासलं असून, ते मतदान करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, मुक्ता टिळक मतदानाला आल्या असून, लक्ष्मण जगतापही मतदान करणार आहेत. दोघांनी राज्यसभा निवडणुकीवेळीही मतदानाचा अधिकार बजावला होता.

विधान परिषद निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होत आहे. मतदानासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही आमदार विधान भवनात दाखल झाले आहेत. तर काही आमदारांच्या बसेस विधान भवनाच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत.

छोटे पक्ष आणि अपक्षांकडे नजर!

बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार, एमआयएमचे २, समाजवादी पक्षाचे २, प्रहारचे २, शेकापचा १, शेक्रांप १, मनसे १, जनसुराज्य १, रासप १ आणि माकप १ आमदार.

अपक्ष आमदारांमध्ये राजेंद्र येड्रावकर, चंद्रकांत पाटील, किशोर जोरगेवार, विनोद अग्रवाल, आशिष जैस्वाल, राजेंद्र राऊत, संजय शिंदे, नरेंद्र भोंडेकर, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, प्रकाश आवाडे, रवि राणा, महेश बालदी यांचा समावेश आहे.

भाजपची काय आहे स्थिती?

दुसरीकडे विरोधी बाकावरील भाजपकडे १०६ मतं आहेत. भाजपनं ५ उमेदवार दिले आहेत. २६ च्या कोट्यानुसार चार उमेदवार निवडून दिल्यानंतर भाजपकडे ९ मते शिल्लक राहतात. त्यामुळे पाचव्या जागेसाठी भाजपला अधिकच्या मतांची तडजोड करावी लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यसभा निवडणुकीत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. भाजपची रणनीती काय असणार याकडेही सगळ्यांची नजर असणार आहे.

महाविकास आघाडी काय आहे स्थिती?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची २ मतं कमी झाली आहेत. त्याचबरोबर विजयासाठी २६ मतं लागणार आहे.

शिवसेनेकडे ५५ मतं असून, दोन उमेदवार आहेत. त्यामुळे सेनेकडे ३ मत अतिरिक्त आहेत. राष्ट्रवादीची ५१ मते असून, त्यांना दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी बाहेरचं १ मतं लागणार आहे. काँग्रेसकडे ४४ मते असून, दोन उमेदवार आहे. त्यामुळे काँग्रेसला बाहेरच्या ८ मतांची गरज आहे.

कुणाची विधान परिषदेची संधी हुकणार?

विधान परिषदेसाठी भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांनी उमेदवारी दिलीये. शिवसेनेनं सचिन अहिर, आमशा पाडवी यांना तिकीट दिलंय. राष्ट्रवादी काँग्रसने भाजपतून आलेल्या एकनाथ खडसेंबरोबर रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दोन जागांसाठी लागणारा मतांचा कोटा कमी असतानाही चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांनी रिंगणात उतरवलंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT