राज्यसभेसाठी आज मतदान, सहाव्या जागेसाठी मोठी चुरस; वाचा काय आहेत नियम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संपूर्ण राज्याचं तसंच देशाचं लक्ष लागलेली राज्यसभा निवडणूक आज पार पडते आहे. राज्यात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये भाजपचे दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक आणि काँग्रेस एक असे उमेदवार निवडून येतील हे निश्चित आहे. मात्र सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेसाठी उमेदवार दिला आहे.

आज पार पडत असलेल्या या मतदानासाठी क्रॉस व्होटिंग किंवा मतं फुटू शकतात ही भीती सगळ्याच पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) पक्षातल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसतो आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसंच भाजपने आपल्या आमदारांना मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे.

आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून मत मोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. मात्र एका आमदाराचं निधन झालंय. तर अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदानाचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे २८५ मतदार सहा जागांसाठी मतदान करतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणूक : ‘ट्रायडंट’मधील बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

सहा जागांकरीता सात उमेदवार मैदानात आहेत

ADVERTISEMENT

जे संख्याबळ सगळ्या पक्षांकडे आहे त्यानुसार भाजपचे दोन तर महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तिन्ही पक्षांतल्या उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना मैदानात उतरवलंय. तर भाजपनेही उर्वरित मतं तसंच अपक्ष यांच्या जोरावर कोल्हापूरच्या धनंजय महाडीक यांना मैदानात उतरवलं आहे.

ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीकरीता भाजप आणि शिवसेना या २०१९ मध्येच एकमेकांचे शत्रू झालेल्या पक्षांमध्ये चुरस पाहण्यास मिळेल यात काहीही शंका नाही. महाविकास आघाडीतचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लॉड्रींग प्रकरणात तर नवाब मलिक हे दाऊदशी संबंधित लोकांशी व्यवहार केल्याच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. या दोघांनाही विशेष कोर्टाने मतदानाचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची ही दोन मतं कमी झाली आहेत.

Rajya Sabha Election : मतदानासाठी वापरलं जातं खास पेन, काय आहेत वैशिष्ट्ये?

काय आहे राज्यसभा निवडणुकीची नियमावली?

– मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदाराला (आमदार) पेन दिला जातो. त्याचाच वापर आमदाराला मतदान करताना करावा लागतो. हा पेन मतपत्रिकेसोबतच दिला जातो. इतर कोणतंही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन अथवा चिन्हांकित करण्याचं कोणतंही साधन यांचा वापर आमदाराने केला तर ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.

– आमदारांना दिल्या जाणाऱ्या मतपत्रिकेवर उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढे पसंतीक्रम असा रकाना असतो. आमदाराला प्रथम पसंतीक्रम म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम या स्तंभात १ हा अंक लिहून मतदान करायचं असतं. १ असा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहायचा असतो.

– एकापेक्षा जास्त उमेदवार राज्यसभा निवडणूक लढवत असले, तरीही १ हा पसंतीक्रम फक्त एकाच नावासमोर लिहायचा असतो.

– निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या संख्येव्यतिरिक्त निवडणूक लढवणारे अनेक उमेदवार असतील आणि पसंतीक्रम ठरवायचा असेल म्हणजे समजा पाच उमेदवार निवडणूक लढवत असती आणि केवळ दोन उमेदवारांना निवडून द्यायचं असेल तर आमदारांना पसंतीक्रमानुसार एक ते पाच या उमेदवारांच्या नावांपुढे दर्शवलेल्या अंकासाठी पसंतीनुसार चिन्हांकन करायचं असतं. (ज्याला पहिली पसंती आहे, त्याला १ क्रमांक अशा पद्धतीने).

– आमदार पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर पंसंतीक्रमाचा चिन्हक्रम या रकान्यात २, ३ , ४ असे अंक लिहून उर्वरित उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मत देऊ शकतात.

– आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर केवळ एकच अंक दर्शवला आहे याची खात्री करून घ्यायची असते आणि एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर तोच अंक दर्शवलेला नाही याचीही खात्री करायची असते.

– पसंतीक्रम हा केवळ अंकांमध्येच म्हणजेच १, २, ३ असाच लिहायचा असतो. हा पसंतीक्रम शब्दांमध्ये म्हणजे एक, दोन, तीन असा लिहायचा नसतो.

– पसंतीक्रम १, २, ३ या भारतीय संख्याप्रमाणे किंवा I II III या प्रमाणे रोमन स्वरूपात लिहिता येऊ शकतात.

– मतपत्रिकेवर नाव किंवा इतर कोणतेही शब्द लिहायचे नसतात. त्याचबरोबर स्वाक्षरी किंवा नावाची अद्याक्षरंही लिहायची नसतात. अंगठ्याचा ठसा उमटवण्यासही मज्जाव असतो. तसं केल्यास ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.

– आमदाराला पसंतीक्रम दर्शवण्यासाठी कोणतंही चिन्हं किंवा X यासारखे चिन्ह दर्शवणं अयोग्य असतं. अशी मतपत्रिकाही बाद ठरवण्यात येईल.

– मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही एका उमेदवाराच्या नावासमोर १ हा अंक लिहून पसंतीक्रम दर्शवायचा असतो. नंतरचे पसंतीक्रम म्हणजेच २ किंवा ३ हे लिहिणं आमदारासाठी वैकल्पिक असतं. म्हणजेच पहिला क्रमाक लिहिल्यानंतर दुसरा किंवा त्यानंतरचा पसंतीक्रम दर्शवलाच पाहिजे अशी सक्ती नसते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT