विधवा महिलांना गंगा-भागीरथी का म्हटलं जायचं.. काय आहे नेमकं कारण?
विधवा महिलांना गंगा-भागीरथी म्हटलं जावं अशा आशायचं पत्र महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढलं. ज्यावरून बराच गदारोळ सुरू आहे. पण विधवांना गंगा-भागीरथी का म्हटलं जायचं हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं एक पत्र सध्या खूपच चर्चेत आहे. त्यांनी महिला व बालविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून विधवा (widow) महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवाऐवजी गंगा-भागीरथी (Ganga-Bhagirathi) हा शब्द वापरण्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी असा प्रस्ताव दिला आहे. यावरुन आता जोरदार विरोध सुरु झाला आहे. विधवांना गंगा भागीरथी म्हणणं किती योग्य? गंगा भागीरथी असं का म्हटलं जातं? याचा अर्थ काय? या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर समजून घेऊया. (why widow women are called ganga bhagirathi what is the real reason)
अपंग व्यक्तींबाबत पंतप्रधान मोदींनी दिव्यांग म्हणा अशी संकल्पना मांडली. त्यामुळे, अपंग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असंही या पत्रात म्हटलं आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधवांबाबत हा प्रस्ताव तयार करावा असं महिला मंत्र्यांचं म्हणणं आहे. या पत्रावरुन सामाजिक कार्यकर्ते, लेखक, महिला आयोग आणि राजकीय नेत्यांच्या या निर्णयाच्या बाजूनं आणि विरोधात बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या.
पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला विधवा न संबोधता सन्मानजनक पर्यायी शब्द वापरावा अशी शिफारस सर्वप्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केली होती. त्यामुळे, लोढांच्या या निर्णयाबद्दल चाकणकरांनी अभिनंदन केलं. राष्ट्रवादीच्याच खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करुन याच्या बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया दिली. हे अतिशय वेदनादायी आहे. हा निर्णय मागे घ्या असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. त्यामुळे, राष्ट्रवादीतच या निर्णयामुळे मतभेद असल्याचं समोर आलं. सुप्रिया सुळेंप्रमाणेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला.
अधिक वाचा- Palghar : PUBG खेळत असताना १६ वर्षांचा मुलगा इमारतीवरून खाली कोसळला
कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी सौभाग्यवती श्रीमती असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे? असा सवाल चित्रा वाघांनी उपस्थित केला होता.
विधवा महिलांना गंगा-भागीरथी का म्हटलं जातं?
मुळात विधवा महिलांना गंगा भागिरथी का म्हटलं जातं? याविषयी स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्याशी आम्ही संवाद साधला. पती गेल्यानंतर स्त्रीला गंगेला अर्पण करणं या अर्थानं गंगा भागिरथी म्हणजेच गं.भा. असं लिहिण्याची प्रथा रुढ झाली. ही सनातनी, हिंदू धर्मातील पितृसत्ताक उपाधी आहे. स्त्रीचा वैवाहिक दर्जा नमूद करणारे कोणतेच उपपद वापरण्याची आवश्यकता नाही. कारण, तिचे स्थान तिच्या कतृत्वाने ठरते.
अधिक वाचा- Pune Loksabha : काँग्रेसच्या जागेवरच राष्ट्रवादीचा ‘डोळा’; पुण्यात नवं राजकारण
अशाप्रकारे महिलेच्या नावासमोर काही उपाधी लिहिण्याची गरजच काय? असे प्रतिगामी निर्णय घेण्यापेक्षा त्यापेक्षा अशा महिलांना कुटुंबात, समाजात समान वागणूक, न्याय मिळवून देण्याचा विचार सरकार का करत नाही? अशा महिलांना समाजात हीन वागणून दिली जाते. कुंकू लावणं, मंगळसूत्र घालणं, धार्मिक समारंभ यापासून तिला वंचित ठेवलं जातं. तिची आर्थिक कुचंबणा केली जाते. अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी काही चांगल्या योजना, त्यांना प्रशिक्षण देणे, सुलभ कर्ज देणं अशा योजनांबाबत सरकार विचार का करत नाही? या गोष्टींऐवजी असे निर्णय घेऊन काय साध्य होणार असा सवालही किरण मोघेंनी उपस्थित केला आहे.
स्त्रीवादी लेखिका वंदना खरेंनीही यावरुन सरकारवर ताशेरे ओढलेत. ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी यांसह इतर धर्मातील विधवा महिलांच्या नावामागे गंगा भागिरथी असं हिंदू उपनाम का लावावं? असा सवालही त्यांनी मुंबई Tak सोबत बोलताना उपस्थित केला आहे.
अधिक वाचा- Maharashtra Political Crisis: ‘या’दिवशी लागणार निकाल.., शिंदे राहणार की ठाकरे येणार?
या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात. कुठल्याही महिलेला कुमारी, सौ, विवाहित, अविवाहित, घटस्फोटिता, परित्यक्ता, गं.भा. या उपाधी देणं किती योग्य आहे? मग पुरुषांसाठी अशी विशेषणं का वापरली जात नाहीत? अशाप्रकारे महिलेच्या नावापुढे गं.भा. लिहून तिचा सन्मान कसा होतो? स्त्रियांना सरसकट श्रीमती आणि पुरुषांना श्रीयुत म्हणावे असाही एक मतप्रवाह आहे.