Rohit Sharma: '...नाहीतर मी सूर्याला बसवलं असतं', रोहितची मराठीतून तुफान फटकेबाजी; भाषण जसंच्या तसं
Rohit Sharma Marathi Speech: विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने मराठीतून भाषण केलं. रोहितचं मराठी भाषण जसंच्या तसं..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रोहित शर्माची मराठीतून फटकेबाजी
विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये खेळाडूंचा सत्कार
सूर्यकुमार यादवच्या कॅचवर काय बोलला रोहित शर्मा?
Rohit Sharma Marathi: मुंबई: टी-20 वर्ल्डकप जिंकून भारतीय संघाने एक नवा इतिहास रचला.. यानंतर भारतात परतलेल्या भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. काल (4 जुलै) मुंबईत आलेल्या भारतीय संघाचं न भूतो न भविष्यती असं स्वागत झालं. ज्यानंतर आज टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील मुंबईचे इतर खेळाडू यांचा विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी कर्णधार रोहित शर्मा याने चक्क मराठीतून भाषण करताना तुफान फटकेबाजी केली. (rohit sharma speech in marathi in central hall of legislature see what team india captain said about suryakumar yadav catch)
टी-20 विश्वचषक जिंकून भारतात परतलेल्या रोहित शर्मा आणि संघाचं काल जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तर आज विधिमंडळात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याचवेळी रोहितने मराठीतून भाषण केलं.
'सूर्याच्या हातात बॉल बसला ते बरं झालं.. नाही तर पुढे त्याला मी बसवलं असतं', रोहित शर्माचं मराठी भाषण जसंच्या तसं..
'सगळ्यांना माझा मोठा नमस्कार.. सीएम सर तुमचे आभार.. तुम्ही आम्हाला इकडे बोलावलं त्याबद्दल. बरं वाटलं सगळ्यांना बघून.. सीएम साहेबांनी मला आताच सांगितलं की, असा कार्यक्रम इकडे कधी झाला नव्हता. आमच्यासाठी असा कार्यक्रम आयोजित केला हे पाहून आम्हालाही फार आनंद वाटला. काल आम्ही जे मुंबईत पाहिलं ते खरंच स्वप्नवत होतं. आमचं देखील एक मोठं स्वप्न होतं की, वर्ल्डकप आम्हाला भारतात आणायचा आहे. 11 वर्ष आम्ही थांबलेलो या वर्ल्डकपसाठी. 2013 मध्ये आम्ही शेवटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो होतो.'
'मी फक्त सगळ्यांचा खूप आभारी आहे. हे जे काही घडलं ते माझ्यामुळे, सूर्या किंवा शिवम यांच्यामुळे नाही घडलं तर सगळ्या खेळाडूंमुळे हे घडलं आहे. मी लकी आहे.. कारण जी टीम मला मिळाली त्यातील सगळे खेळाडू हे अगदी जबरदस्त होते. जेव्हा टीमला गरज होती तेव्हा वेगवेगळ्या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूने आपली कामगिरी चोख बजावली.'










