SA vs IND : टीम इंडिया विजयाच्या जवळ, दुसऱ्या डावातही आफ्रिका संकटात

मुंबई तक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली आहे. आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान देण्यात भारतीय संघ यशस्वी झाला आहे. दुसऱ्या डावात भारताचा डाव १७४ धावांत गुंडाळण्यात आफ्रिकेला यश आलं. परंतू चौथ्या दिवसाअखेरीस आफ्रिकेची अवस्था ४ बाद ९४ अशी झालेली आहे. ज्यामुळे अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यासाठी आफ्रिकेला कसोशीने प्रयत्न करावे लागणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली आहे. आफ्रिकेला विजयासाठी ३०५ धावांचं आव्हान देण्यात भारतीय संघ यशस्वी झाला आहे. दुसऱ्या डावात भारताचा डाव १७४ धावांत गुंडाळण्यात आफ्रिकेला यश आलं. परंतू चौथ्या दिवसाअखेरीस आफ्रिकेची अवस्था ४ बाद ९४ अशी झालेली आहे. ज्यामुळे अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यासाठी आफ्रिकेला कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.

पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात एडन मार्क्रमला क्लिन बोल्ड करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर किगन पीटरसनने काही सुरेख फटके खेळून आफ्रिकेच्या डावाला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला. परंतू मोहम्मद सिराजने त्याचा अडसर दूर केला. दुसऱ्या बाजूला डीन एल्गरने एक बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला.

परंतू भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने आफ्रिकेला धक्के देत सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. कर्णधार एल्गरने या दरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताशी दोन हात केले. परंतू अखेरच्या दिवसात पराभव टाळण्यासाठी एल्गरला मोठी खेळी करावी लागणार आहे. चौथ्या दिवसाअखेरीस भारताकडून बुमराहने २ तर शमी आणि सिराजने १-१ विकेट घेतली.

त्याआधी, तिसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघाने दुसऱ्या डावात १ विकेट गमावत १६ धावांपर्यंत मजल मारली. यावेळी भारताकडे १४६ धावांची आघाडी होती. अखेरच्या दिवशी सेंच्युरिअनचं वातावरण पुन्हा ढगाळ असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे भारतीय संघ चौथ्या दिवशी कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष होतं.

परंतू दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. नाईट वॉचमन शार्दुल ठाकूर रबाडाच्या बॉलिंगवर माघारी परतला. यानंतर भारतीय डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. सर्वच महत्वाचे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांनी मोक्याच्या क्षणी जास्त धावा करण्याची संधी गमावली. मधल्या फळीत ऋषभ पंत आणि रविचंद्रन आश्विनने छोटेखानी भागीदारी करुन भारताला आव्हानात्मक आघाडी मिळेल याची काळजी घेतली. परंतू ते देखील फारकाळ तग धरु शकले नाहीत.

आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात कगिसो रबाडा आणि जेन्सनने प्रत्येकी ४-४ तर एन्गिडीने २ विकेट घेतल्या. त्यामुळे आता अखेरच्या दिवसाच्या खेळात आफ्रिकन फलंदाज भारतीय गोलंदाजीचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp