Abhijit Dipke : वर्षभराच्या कालावधीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आपल्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी घरी परतले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर कुटुंबीयांनी हार घालून आणि औक्षण करून त्यांचे स्वागत केले. वर्षभरानंतर घरात परतलेल्या दीपके यांना पाहून कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अभिजीत दीपकेही भावूक झाल्याचे दिसून आले. दीर्घ काळानंतर आई-वडील आणि कुटुंबीयांची भेट होत असल्याने त्यांची उत्सुकता स्पष्टपणे जाणवत होती. आंदोलन आणि विविध उपक्रमांमुळे घरापासून दूर राहिलेल्या दीपकेंसाठी हा क्षण विशेष ठरला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात तुफानी पावसाची शक्यता, 26 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
'गेल्या पंधरा दिवसांत कुटुंबीयांना त्रास दिला गेला'
घरी परतण्यापूर्वी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या पोस्टमध्ये त्यांनी आपण आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी जात असल्याचे सांगितले होते. त्यांना भेटून एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या पंधरा दिवसांत त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला. तसेच धमक्यांमुळे घर सोडावे लागल्याचेही त्यांनी म्हटले. आता त्यांना पुन्हा घरी परत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जंतरमंतरवरील आंदोलन हे केवळ ट्रेलर असल्याचे सांगत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या लोकांचे त्यांनी आभारही मानले होते.
हेही वाचा : नागपूर: पिकनिकला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू, बापासह लेकाचा समावेश
आणखी व्यापक करण्याचा निर्धार
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचल्यानंतर अभिजीत दीपके यांनी पुढील आंदोलनाची दिशा देखील स्पष्ट केली. दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करत त्यांनी हा लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगत देशभरातील युवक आणि विद्यार्थ्यांचा पाठिंबा वाढत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंदोलन आता केवळ एका शहरापुरते किंवा एका ठिकाणापुरते मर्यादित राहणार नसून ते देशव्यापी स्वरूपात पुढे नेले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाला पाच ते सहा हजार तरुण उपस्थित होते, असा दावा अभिजीत दीपके यांनी केला आहे. या प्रतिसादामुळे आंदोलनाला नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी म्हटले. आता हा लढा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नांवर केंद्रित असलेल्या या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळताना दिसत असला, तरी आगामी काळात देशभरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पातळीवर त्याला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, वर्षभरानंतर कुटुंबीयांच्या भेटीसाठी घरी परतलेल्या अभिजीत दीपके यांनी भावनिक क्षण अनुभवतानाच आपल्या आंदोलनाची पुढील दिशा आणि भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT











