Farmer Protest : "भिकार## योजना...", बच्चू कडूंनी 'गॅरंटी'वरून मोदींना डिवचलं

मुंबई तक

15 Feb 2024 (अपडेटेड: 15 Feb 2024, 08:38 AM)

Bacchu kadu farmer protest Modi Government : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

शेतकरी आंदोलनावरून बच्चू कडू मोदी सरकारला काय बोलले?

Bacchu kadu Attacks on Modi Government over Farmer protest

follow google news

Bacchu kadu farmer protest marathi news : शेतमालाला हमी भाव देण्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या दिशेने निघालेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना रोखण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहे. आता याच मुद्द्यावरून सरकारमध्ये असलेल्या प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सरकारच्या योजनांना भिकार#$ म्हणत थेट पंतप्रधान मोदींना सवाल केला आहे.  
 
बच्चू कडू अमरावती येथे माध्यमांशी बोलत होते. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना आमदार कडू म्हणाले, "आंदोलन चिघळायला नको म्हणून सरकारने निर्णय घेतला पाहिजे, नाही तर आम्ही सुद्धा आंदोलनात सहभागी होऊ."

हे वाचलं का?

मोदींना बच्चू कडूंचा सवाल

आमदार बच्चू कडू म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टींची गॅरंटी घेत आहेत. मग हमीभावाची गॅरंटी का घेत नाहीत?", असा सवाल करत कडूंनी थेट मोदींना डिवचलं. 

मोदी सरकारबद्दलच्या कामगिरीवर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, "हे सरकार पूर्ण फेल झालं आहे. मी जरी सरकारमध्ये असलो, तरी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही चांगल्या योजना दिल्या नाहीत. भिकार## योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना हमी भाव द्या. शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाहीत. उलट त्यांचं व्याज कापलं जात. सरकारने डाकेखोरी बंद केली पाहिजे", अशा शब्दात कडूंनी आपल्याच सरकारला खडेबोल सुनावले. 

अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली बच्चू कडू म्हणाले...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरावर बच्चू कडू म्हणाले, "विकासाचं जाळ आहे. त्या जाळ्यात ते अडकले आहेत. विकासाच्या जाळ्यात अडकल्यामुळेच या सगळ्या गोष्टी होत आहेत. अशोक चव्हाण दोन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये का गेले? तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण लोकांच्या मनात संभ्रम आहे. तुम्ही दोन वेळा मुख्यमंत्री असताना भाजपमध्ये का गेले, हे स्पष्ट झालं पाहिजे", असा सवाल कडूंनी चव्हाणांना केला आहे. 

शेतकऱ्यांच्या अडवल्या वाटा

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा थांबवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. 

याशिवाय सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत. 

    follow whatsapp