गणेश जाधव, धाराशिव: : सोलापूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन महिलांचा त्यात समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. क्रूझर गाडीचे टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, अपघातातील प्रवासी देवदर्शनासाठी निघाले होते. सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण उळे येथील रहिवासी असल्याचे समजते. आज सकाळच्या सुमारास ही मंडळी नळदुर्गकडे क्रूझरमधून जात असताना हा अनर्थ घडला. महामार्गावर गाडीचा वेग कायम असतानाच पुढील टायर फुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या मध्यभागी अनियंत्रितपणे होऊन पलटी झाले. गाडी उलटताच ती थेट पुढे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला आदळली. या धडकेत गाडीचा अक्षरश: चुराडा झालाय. क्रूझरचा पुढील भाग पूर्णपणे चिरडल्याने आत बसलेले प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. काही प्रवासी वाहनाच्या खाली दाबले गेले. त्यामुळे मृतांची संख्या अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : मुंबई: डिलीव्हरी बॉय महिलेच्या घरी गेला आणि पाहता क्षणीच प्रेमात पडला, नंतर रिफंडच्या बहाण्याने मॅसेज अन्...
या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ जण गंभीर जखमी आहेत. स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी वाहन चालकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित बाहेर काढून सोलापूर येथील सरकारी व खासगी रुग्णालयांकडे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
जखमींवर सध्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये महिलांचा समावेश असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. वाहनाचा पुढील तपास करण्यासाठी घटनास्थळी पंचनामा सुरू करण्यात आला आहे. क्रूझरचा टायर फुटण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार टायरची गुणवत्ता, वाहनाचा वेग किंवा रस्त्यावरील अडथळा यांपैकी कोणते तरी कारण कारणीभूत असावे, असे मानले जात आहे.
अपघाताच्या आवाजाने परिसरातील लोक बाहेर आले. महत्त्वाचे म्हणजे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. बचावकार्य आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या दुर्घटनेने दक्षिण उळे गावात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
डॉक्टरांनी औषधं दिली, महिलेने पाकीट उघडताच कॅप्सुलमधून अळ्या बाहेर, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
ADVERTISEMENT











