India vs England 5th Test: लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5व्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय नोंदवला. या विजयासह, 5 सामन्यांचा अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 मालिका 2-2 अशी ड्रॉ झाली आहे.
ADVERTISEMENT
या सामन्यात भारताने इंग्लंड संघाला विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने पहिल्या डावात 224 धावा केल्या असताना, इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांपर्यंत मर्यादित राहिला. म्हणजेच यजमान इंग्लंडला पहिल्या डावाच्या आधारे 23 धावांची थोडीशी आघाडी मिळाली होती. त्यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 374 धावांची गरज होती.
पण शेवटच्या डावात इंग्लंडला तिथवर मजल मारता आली नाही आणि त्यांचा अवघ्या 6 धावांनी पराभव झाला.
टीम इंडियाने कसा फिरवला सामना?
या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच येऊ शकला असता, परंतु चौथ्या दिवशी पावसामुळे तिसऱ्या सत्रात फक्त 10.2 षटके खेळता आली. पाऊस थांबला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अशा परिस्थितीत चौथ्या दिवसाचा खेळ संपवावा लागला. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता होती, तर भारताला 4 विकेट्सची आवश्यकता होती.
हे ही वाचा>> Video फक्त बघतच राहा..'या' खेळाडूने पकडला क्रिकेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच!
सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाचा निर्णायक स्पेल
300 धावांवर 3 विकेट असताना इंग्लंड संघ हा सामना सहज जिंकेल अशी परिस्थिती होती. मात्र, त्यानंतर अचानक प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी अत्यंत तिखट मारा करत इंग्लंडच्या पुढच्या 47 धावात तब्बल 3 गडी बाद केले. पण पावसाच्या व्यतत्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला.
त्यामुळे आज म्हणजेच कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 4 गडी बाद करणं आवश्यक होतं तर इंग्लंडला केवळ 35 धावांची गरज होती. त्यामुळे इंग्लंडने पाचव्या दिवसाची सुरुवात आक्रमकपणे केली. सुरुवातीलाच ओव्हरटनने दोन चौकार लगावले. त्यामुळे इंग्लंड अधिक विजयाच्या समीप पोहचला.
हे ही वाचा>> IPL 2025 Video : स्टंपला बॅट लागूनही सुनील नरेनला OUT दिलं नाही! 'हा' नियम वाचून तुम्हीही व्हाल थक्क
सिराजने 'इथे' फिरवला खरा गेम
पण त्यानंतर सिराजने आक्रमक गोलंदाजीचा नमुना पेश करत स्फोटक फलंदाज असलेल्या जेमी स्मिथला बाद केलं आणि इथेच खरा सामना त्याने फिरवला. कारण त्यानंतर तळाच्या फलंदाजाना 374 धावांपर्यंत मजल मारता आली नाही.
तळाचा फलंदाज एटकिन्सन याने 17 धावा करत इंग्लंडला विजयापर्यंत पोहचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, इंग्लंडला विजयासाठी अवघ्या 6 धावा शिल्लक असताना सिराजने त्याला बाद केलं आणि भारताला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला.
खरं तर कसोटी क्रिकेट हे कंटाळवाणं असल्याचं अनेक जण म्हणतात. मात्र, इंग्लंडसोबतचा हा सामना ज्या पद्धतीने खेळला गेला ते पाहता तो कसोटी नव्हे तर टी-20 सामना आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता.
ADVERTISEMENT
