जळगाव : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यानं एका विद्यार्थ्यानं थेट टोकाचं पाऊल उचललं. नैराश्यातून जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावातील 17 वर्षीय विद्यार्थी ऋषिकेश दिनेश पाटील याने सोमवारी (५ मे) राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
ऋषिकेशसोबत काय घडले?
ऋषिकेश दिनेश पाटील हा ममुराबाद आपल्या आई-वडील, आजी आणि मोठ्या भावासोबत राहत होता. त्यानं विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. सोमवारी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. या निकालात ऋषिकेशला केवळ 49 टक्के गुण मिळाले. मात्र, त्याला त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी होते. या निकालामुळे तो प्रचंड निराश झाला.
हे ही वाचा >> "तुझे वडील संतोष देशमुख यांना किती...", CM फडणवीस यांचं वैभवीला भावनिक पत्र, काय शब्द दिला?
मानसिक तणावात असलेल्या ऋषिकेशने दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण दुसरीकडे असताना दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन जीवन संपवले. काही वेळाने त्याची आई घरात आली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. तातडीने शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत ऋषिकेशचे प्राण गेले होते.
पोलीस कारवाई आणि तपास
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ऋषिकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात निकालातील अपयशामुळे नैराश्य हे आत्महत्येचे कारण असल्याचे समोर आले आहे.
नैराश्याचे गंभीर परिणाम
ही घटनेमुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या निकालानंतर येणाऱ्या मानसिक दबावाचे गांभीर्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांनी पालकांना आवाहन केलं आहे की, मुलांना निकालाच्या दबावापासून मुक्त ठेवा आणि त्यांच्याशी सतत संवाद साधा. "निकाल हा आयुष्याचा शेवट नाही. मुलांना प्रोत्साहन आणि मानसिक आधार देणं गरजेचं आहे," असं मत मानसोपचारतज्ज्ञांन व्यक्त केलंय.
हे ही वाचा >> Maharashtra Board 10th Result 2025: बारावीचा निकाल तर लागला आता 10 वीचा निकाल 'या' तारखेपर्यंत होणार जाहीर?
दरम्यान, शिक्षण व्यवस्थेतील स्पर्धात्मक दबाव आणि त्याचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम यावरही सध्या चर्चा सुरू झाली आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्रे सुरू करण्याची मागणी केली आहे.
पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. ही घटना समाजाला विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखित करते.
ADVERTISEMENT
