Nagpur Crime : नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 30 वर्षीय नातवाने आपल्याच 68 वर्षीय वृद्ध आजीची निर्घृण हत्या केली. मृत आजीचे नाव किशोरी उर्फ इंदू असून, आरोपीचे नाव राज प्रभात वाघडे असे आहे. आजीच्या एटीएम कार्डमधून गुपचूप 20 हजार रुपये काढल्याची चोरी पकडली गेल्यामुळे आणि आजीने सतत फटकारल्यामुळे संतप्त झालेल्या नातवाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी वेगाने तपास चक्रं फिरवत अवघ्या काही तासांतच आरोपी नातवाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ATM मधून पैसे काढल्याने रागावली आजी
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राज हा इंदू यांना ‘मोठी आजी’ म्हणायचा आणि ते दोघे एकत्र राहत होते. सुमारे 4-5 दिवसांपूर्वी राजने घरातून आजीचे एटीएम कार्ड चोरून त्यातून 20 हजार रुपये काढले होते. ही बाब समजल्यापासून आजी त्याला सतत रागावत होती. दरम्यान, बुधवार 20 मे रोजी उशिरा रात्री राज दारूच्या नशेत तो घरी पोहोचला. त्यावेळी पैसे चोरी केल्याबद्दल आजी त्याला रागावली. यावरून चिडलेल्या नातवाने रागाच्या भरात आजीच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. या गंभीर हल्ल्यामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा : लग्नानंतर 12 दिवसांतच वहिनीवर जडला जीव, नकार देताच दीराने.., हादरवून टाकणारं प्रकरण
घरातच ठेवला मृतदेह अन्..
हत्या केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्याने खोलीत सांडलेले रक्त साफ केले आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य लपवून ठेवले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी खोलीतून कोणतीही हालचाल झाली नाही. तसेच राज कोणालाही कारणाशिवाय घरात जाण्यापासून रोखत राहिला. शुक्रवारी सकाळी घरात पाणी न आल्यामुळे जेव्हा दुसरा भाऊ दीपक हा पाहायला गेला, तेव्हा त्याला इंदू यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चाकूचे कव्हर आणि इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले.
हे ही वाचा : अंगणात रक्ताचा सडा, 16 वर्षीय मुलगीही गायब; 'त्या' कुटुंबात नेमकं काय घडलं?
नागपुरात गुन्ह्यांचे वाढते प्रमाण
श्वान पथकाच्या मदतीने आणि रक्ताच्या डागांवरून राजला पोलिसांनी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून पाचपावली पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत असून गेल्या 22 दिवसांत तब्बल 11 जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या सलग घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ADVERTISEMENT











