Ajit Pawar Death: अजित पवार यांची आज (दि.28) बारामतीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामती विमानतळावर उतरत असतानाच हे विमान अपघातग्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. नियंत्रण सुटल्याने हे विमान विमानतळाच्या परिसरातील एका शेतात कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी धुराचे मोठे लोट उठताना दिसून आले, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पाहा, या भीषण घटनेचे लाईव्ह अपडेट्स..
ADVERTISEMENT
- बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान ग्राउंडवर अजित पवार यांच्यावरील अंत्यसंस्काराची तयारी सुरू
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन हे देखील अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीला जाणार आहेत.
बारामती
-फुलांनी सजवलेल्या ऍम्ब्युलन्स मध्ये अजितदादा यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठाण येथे संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आणण्यात आले आहे.
-आपुलकी, प्रेमाने चौकशी करणारे दादा निघून गेले - राष्ट्रवादी (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे भावनिक
आमच्या कुटुंबाचा प्रमुख हरवल्याचं दु:ख आहे. पक्ष फुटला तरी आपुलकी, प्रेमाने चौकशी करणारे दादा आपल्यातून निघून गेले आहेत. उद्याच्या इतिहासात नोंद होईल असा, कार्यकर्ता जपणारा, जागृत लोकप्रतिनिधी आणि नेतृत्त्त्व हरवलं आहे. महाराष्ट्रात, आमच्या पक्षात आणि कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही घटना दु:खद आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि आमचा सर्व परिवार दु:खात आहे.
नाईक बारामती कडे रवाना....
अजित दादा आपल्यात नाही ही जिव्हारी लागणारी घटना आहे, अजित दादांच्या जाण्याने नाईक परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. स्पष्ट आणि स्वच्छ व्यक्तिमत्व असलेले अजित दादा नाहीत ही कल्पनाचं करवत नाही. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी नगराध्यक्ष पुसद सौ मोहिनी इंद्रनील नाईक यांना अश्रू अनावर.
- माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते हंसराज अहिर यांची प्रतिक्रिया
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते हंसराज अहिर यांनी शोक व्यक्त केला आहे. अजित दादा कुशल संघटक होते, उत्तम राजकारणी आणि चांगले शासक होते. प्रशासनावर त्यांचा दरारा होता, माणसं जोडणारा हा नेता आपल्यातून गेल्याचं अतिव दुःख असल्याचं हंसराज अहिर यांनी आपल्या शोक संवेदनेत सांगितले.
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री महोदय, आमदार, खासदार त्याचबरोबर राज्यातून विविध पक्षांचे वरिष्ठ नेते आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान भव्य मैदानावर लाखो अजित दादांवर प्रेम करणारे चाहते हे आपल्या नेत्याला शेवटचा सलाम करण्यासाठी उपस्थित आहेत.
- अजित पवारांच्या जाण्यावर विश्वास बसत नाही- आशिष जयस्वाल, राज्यमंत्री वित्त...
"दादा माणूस" या नावाप्रमाणे त्यांचं व्यक्तीमत्व होत, दादा जाणं हे कधीच न भरून निघणारे आहेत. ते उत्तम राजकारणी प्रशासनावरील काम करणारे नेते होते, अचानक आज त्यांच्या दुःखद निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. त्यांची कार्य शैली हे नेतृत्व गुण होते, ती छाप वेगळी आणि exclusive होती. त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, सनदी अधिकारी यांच्यावर पकड होती. आदेशावर प्रशासन कशा तत्परतेने काम करत होते, यांच उत्तर देता येऊ शकत नाही. आमदारांना असो की एखाद्या व्यक्तीने किती लोकांचं काम करावे, किती क्षमतेने काम करावे यासाठी अग्रक्रमाने राहील, निंर्णय क्षमता आणि अमलबाजावनी साठी फॉल्लोअप घेत होते, अशी दादांची एक्झिट अपेक्षित नव्हती. महाराष्ट्रासाठी खरंच आज कठीण दिवस आहे.
- एक कर्तृत्ववान मनुष्य गेला - संभाजी भिडे गुरुजींची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजी भिडे यांनी ही अति वाईट बातमी असल्याचं म्हणत एक कर्तृत्ववान मनुष्य गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांचे आकस्मिक जाणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत अनपेक्षित अशी घटना आहे. अत्यंत लढाऊ कर्तृत्वाची अशी ही व्यक्ती आकस्मिकपणे निघून जाईल असे शत्रूला सुद्धा वाटले नसेल. त्यांचे कर्तृत्व, बुद्धिमत्ता, धडाडी हे गुण बघता त्यांची आपल्या देशाला खूप आवश्यकता होती. अत्यंत समर्थपणे नेतृत्व करू शकत असणारी अशी ही व्यक्ती होती. त्यांचे असे हे जाणे बघून दुःख होत आहे. भगवंतानी त्यांच्या आत्म्याला सदगती द्यावी अशा शब्दात संभाजी भिडे गुरुजी यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली दिली आहे.
- शेतकरी आणि विकासाचा आवाज हरपला- माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला हादरवणारी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती असणारे, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणारे आणि विकास कामांमध्ये नेहमीच सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व होते, असं बाळासाहेब पाटील म्हणाले. माझा अजितदादांशी गेली 30 वर्षांचा संपर्क होता. 25 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी नेहमी विकास कामांना न्याय देण्याची भूमिका घेतली, असंही पाटील त्यांनी सांगितलं.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
एक स्पष्ट वक्ता नेता, अर्थमंत्री म्हणून काम करताना सर्व क्षेत्रांना न्याय आणि राज्याचं हित याबाबत दादांची परखड भूमिका असायची. राजकारणात मतभेद असले तरी त्यांची आणि माझी मैत्री होती, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
- अजित पवारांच्या अंत्यसंस्काराबाबत मोठी बातमी
अजित पवार यांच्यावर उद्या (29 जानेवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- क्रेंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांची भावूक प्रतिक्रिया
"माझं हृदय जड झालं आहे. ही गोष्ट न पचण्यासारखी आहे. आमची अजित पवार सोबत भेट व्हायची. तरुण मिनिस्टर म्हणून मार्गदर्शन करायचे. त्यांचं काम आणि कामाची पद्धत चांगली होती. त्याचं जाणं हे महाराष्ट्रासाठी मोठं नुकसान आहे. त्यांचासारखा नेता आता मिळणे मुश्कील आहे. आजच्या अपघाताचा तपास सुरु केला असून जेव्हा प्लेन लॅन्डिंगच्या वेळी समस्या उद्भवल्याने ही भीषण घटना घडली."
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
"अजित दादा पवार हे उभरतं नेतृत्व होतं, आम्ही दोघांनी एकत्र सरकार चालवलं होतं. आमच्यात बरेच वेळा वैचारिक मतभेद होत होते मात्र असं असलं तरी एक अभ्यासपूर्ण नेतृत्व हरपला असून त्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे." माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना सांगितलं.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं भावूक ट्विट
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! मी मुख्यमंत्री असताना, मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. अतिशय शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे आणि माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्विकारला तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. महाराष्ट्रात ते 'दादा' म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आहे. ते सर्वार्थाने 'दादा' होते. दादांना माझ्यातर्फे, ठाकरे व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
- सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याची भावूक पोस्ट
विमान अपघातात आपण अजित दादांना गमावल्याचं ऐकून मोठा धक्का बसला आणि खूप दुःख झालं. महाराष्ट्रातील सर्वात गतिमान नेत्यांपैकी एक असलेले, त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या लोकांना सतत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले. त्यांची बुद्धिमत्ता अतुलनीय होती आणि राज्यभरातील लोकांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. त्यांच्या अकाली निधनामुळे एक मोठे नुकसान झालं असून कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा आनंद मला मिळाला आहे. पवार कुटुंब, त्यांच्या प्रियजनांना आणि लाखो समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना.
- अजित पवारांच्या मृत्यूमुळे मुरलीधर मोहोळांचे डोळे पाणावले
दादांचा अशा पद्धतीने मृत्यू हा अनपेक्षित धक्का आहे आणि यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांची प्रशासनावर पकड होती. ते आज आपल्यात नाहीत यात आपल्या सगळ्याच नुकसान आहे. दादा आता नाहीत हे बोलण सुद्धा वेदना देणार आहे. दादांशिवाय पुण्याचं राजकारण याची कल्पनाच होत नाही. मला आज काय बोलाव सुचत नाही. दादांशिवाय मुंबई आणि पुण्याचं राजकारण अधुरं राहिल.
- अजित पवारांच्या निधनावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला शोक
उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते मा. अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सलग सात वेळा विधानसभेवर निवडून आलेले अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड, वेळेचे काटेकोर नियोजन आणि निर्णयक्षमतेसाठी ओळखले जात होते. कोरोना काळात त्यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीचा निधी संपूर्ण महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या नेतृत्वाची दृष्टी दर्शवतो. विधानपरिषद उपसभापतीपदाच्या काळात विविध समित्या व सभागृहाच्या कामकाजात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, शेती व विकास क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
- धाराशिव जिल्ह्यातील बाजार पेठ ठप्प... सर्व व्यवहार बंद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांची सासरवाडी असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अजित दादांची सासुरवाडी असणाऱ्या तेर सह सर्व गावामध्ये सार्वजनिक व्यवहार ठप्प झाले असून, आज धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश दुकानेही बंद आहेत. धाराशिव मधील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली असून, सामान्य नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
- काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंत्यसंस्काराची शक्यता, अजित पवारांच्या घराशेजारील शेतात संपूर्ण शेत नांगरून सपाटीकरण करून घेण्याची तयारी सुरू
- कांग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया
कांग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, "अजित दादाच्या मृत्यूमुळे मनाला मोठा धक्का बसलाय. विधीमंडळात आणि राज्यात अनेक वर्षे एकत्र काम केल्याच्या आठवणीं आहेत. प्रशासन आणि उत्तम प्रशासन यावर अजित दादाची मोठी पकड होती. अजितदादा हे शब्दाचे पक्के होते... एक व्हिजन असलेले व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातून हरपल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात त्यांचा कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थना. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली."
- चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर!
चंद्रशेखर कदमांनी अजित दादांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, माझ्या पेक्षा वयाने लहान पण कर्माने मोठे असलेले अजित दादा जाणे हे मोठे दुर्दैव आहे. माझी आमदारकी दादामुळे खुलन आली. त्यांनी राहूरी तालुका विशेषतः देवळाली साठी नेहमी भर भरुन मदत केली. त्यांच्या जाण्याने देवळाली शहराचा आधारवड गेला. मी त्यांच्या पक्षात नव्हतो तरी कधीच कोणत्याच कामाला कधी नाही म्हणाले नाही. तीन महिन्या पूर्वी खास मला भेटण्यासाठी देवळाली प्रवरा ला आले होते तीच शेवटची भेट ठरली. अजित दादा चे आजोळ असलेल्या देवळाली प्रवरा येथील दादा चे मामे भाऊ माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली. चंद्रशेखर कदम यांना अश्रू आवरणे मोठे मुश्किल झाले त्याबरोबर उपस्थित नागरिकांनी आपल्या अश्रूना वाट मोकळी करुन दिली.
- अजित दादांच्या निधनावर क्रिकेटर सचिन तेंडूलकर याचं ट्विट
अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
- रामदास आठवलेंची भावूक पोस्ट
"महाराष्ट्रच्या पुरोगामी गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला आज माझे मन खूप हेलावले आहे. अजित पवार म्हणजे राजकारणातला एक 'पॉवरफुल' नेता, ज्यांच्या शब्दाला वजन होते आणि निर्णयाला धार होती. दादांचा प्रशासकीय धडाका आणि वेळेचे पालन हे सर्वांसाठीच आदर्श होते. ते स्पष्टवक्ते होते, मनात काहीही न ठेवता जे आहे ते तोंडावर बोलायचे. अशा या रोखठोक नेत्याचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा गड आहे आणि या गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला आहे. दादांनी नेहमीच दलित, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्नांवर आपली ठोस भूमिका मांडली. रिपब्लिकन चळवळीबद्दल त्यांच्या मनात नेहमीच आपुलकी होती. सत्तेत असो वा विरोधात, त्यांचा शब्द हा अंतिम असायचा. त्यांच्या कार्याचा वारसा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. मी माझ्या पक्षातर्फे आणि वैयक्तिकरित्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
- कोल्हापुरचे काँग्रेस पक्षाचे खासदार शाहू महाराज यांनी अजित पवारांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
"अजित पवारांचे आणि आमचे जवळजवळ 30 वर्षांचे संबंध होते. या 25-30 ते एक बहुजन समाजाचे महत्वाचे नेतृत्व म्हणून ते पुढे आले आहेत. गेल्या काही वर्षांत जरी त्यांचे आणि शरद पवारांचे काही मतभेद होते, मात्र ते वैचारिक मतभेद होते. खऱ्या अर्थाने ते सगळे एकच आहेत. सगळ्यांसाठी झटणारा एक महाराष्ट्राचा महत्त्वाचा नेता होता. अर्थव्यवस्थेचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. अनेक वर्ष अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते होते. शरद पवारांनी त्यांना असं चांगलं ट्रेनिंग दिलं होतं की, बहुजन समाजाचे नेतृत्व त्यांनी करावं...अशी व्यक्ती गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे."
- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फलटणचे संजूबाबा नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि राष्ट्रवादीचा मोठा नेता हरपला अशा भावना व्यक्त केल्या.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होत आहेत. राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
- अजित दादा पवारांच्या मृत्यूनंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
गुलाबराव पाटलांनी अजित दादांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं की, "महाराष्ट्रासाठी ही फार दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्राचा खरा दादा, बारामतीचा किल्लेदार, वक्तशीरपणाचा खरा माणूस, आमच्यातून निघून गेला आहे हे महाराष्ट्रासाठी फार मोठे नुकसान आहे. विकास हाच त्यांचा ध्यास होता ही महाराष्ट्राला न भरून निघणारी पोकळी आहे. अशा माझ्या लाडक्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली." ज्या दादा ने सगळ्यांना न्याय दिला परमेश्वराने त्या दादाला काय न्याय दिला नाही अशी भावुक प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे..
- अजित दादांच्या निधनानंतर नितेश राणे यांची भावूक प्रतिक्रिया
अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना घडवणारे, त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करताना मंत्री नितेश राणे हे भावूक झाले. मंत्रिमंडळात अजित दादांसोबत काम करताना त्यांच्या कार्यपद्धतीचा, प्रशासनावरच्या पकडीचा आणि धाडसी निर्णयक्षमतेचा अनुभव घेतल्याचे सांगत त्यांनी अजित दादांना अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
- डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विक करत व्यक्त केला शोक
महाराष्ट्राच्या राजकारणात आता दादा नसतील ही जाणीवच अंगावर काटा आणणारी आहे. कामाचा प्रचंड आवाका आणि उरक असणारा हा लोकप्रिय लोकनेता नियतीने आज आपल्यापासून हिरावला.प्रत्येक ठिकाणी वेळेत जाणारे दादा आज चुकीच्या वेळी गेले…! अधिक लिहवत नाही. शब्द अपुरे आहेत आणि भावना गोठल्या आहेत. पवार कुटुंबियांच्या या दुःखद प्रसंगात आम्ही सहभागी आहोत.
- साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अजित दादांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, "एक स्पष्ट वक्ता नेता, अर्थमंत्री म्हणून काम करताना सर्व क्षेत्रांना न्याय आणि राज्याच हित याबाबत दादांची परखड भूमिका असायची. राजकारणात मतभेद असले तरी त्यांची आणि माझी मैत्री होती, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली."
- भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली भावना
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे, अशी भावना भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. राज्याची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही, असं लोणीकर म्हणाले. अजित दादा अचानक निघून गेल्याने खूप वेदना आणि दुःख होत असल्याचं म्हणत अजित पवार सभागृहात आपली स्पष्ट भूमिका मांडायचे, असंही लोणीकर यांनी म्हटलय. राज्याच्या सभागृहात कधी तणाव झाला, वाद निर्माण झाले तर अजित दादा स्पष्ट भूमिका मांडायचे आणि सभागृह शांत व्हायचे; असं सांगत लोणीकर यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
- अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
अजित दादांच्या मृत्यूनंतर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की, "अजित पवार यांच्या जाण्याचा आपल्या धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने राज्याची आणि देशाची हानी झाली आहे. त्यांचे आपले संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. त्यांच्या काम करण्याची पद्धत ही आदर्श असल्याने, ते सगळ्यांच्या नेहमी स्मरणात राहणार आहेत."
- अजितदादांच्या निधनावर बोलताना सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शोक व्यक्त केला
अजित पवार यांच्या निधनाबद्दल बोलताना खासदार प्रणिती शिंदे भावूक झाल्या, त्या म्हणाल्या "अजित दादा म्हणजे महाराष्ट्राचे दादा होते, त्यांच्या निधनावर विश्वास बसत नाहीये, अजित दादांच्या कामाची पद्धत शिस्तबद्ध होती.9 ची मीटिंग असेल तर ते 10 मिनिटे आधीच हजर असायचे. बोरामणी विमानतळासाठी त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला होता. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. बारामतीमध्येच त्यांच्या स्वतःच्या गावात हा अपघात होणे ही अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक बाब आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित दादांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे."
" अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
- महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. "दिवंगत श्री अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो", असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
- भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांची प्रतिक्रिया
अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्र मोठ्या लोकनेत्याला मुकल्याची भावना भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांची प्रशासनावरील पकड आणि अभ्यास हा कायम विधिमंडळातील सर्वांना शिकण्यासारखा असल्याचं ते बोलले. 2014 ते 19 या काळात अजित दादा विरोधी पक्षात असूनही त्यांची देहबोली ही एखाद्या सत्ताधारी नेत्याला साजेशी अशीच असल्याचं ते म्हणाले. आज अजित पवारांचं जाणं आहे सहन करण्यापलीकडचं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
- अकोल्यातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया
अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र खऱ्या आणि सच्चा लोकनेत्याला मुकल्याची भावना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केली आहे. अजित दादांचं जाणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आणि कुटुंबाला उध्वस्त करणारं असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजित पवारांनी विकास काम करताना कधीच स्वपक्ष आणि विरोधी पक्ष असा भेदभाव केला नसल्याचं ते म्हणाले. .
- आमदार विजयसिंह पंडित यांना अश्रू अनावर...
दोन दिवसांपूर्वी नांदेड येथे झालेल्या भेटीत विजयसिंह पंडित यांना सांगत होते मी जे सांगेल ते करायचं आपण बीडसाठी चांगलं काम करू असा विश्वास अजितदादांनी दिला होता. त्याचबरोबर अजितदादांनी जी पगडी घातली होती त्या पगडीमध्ये अजित दादा चांगले दिसत होते दादा आपण एक फोटो काढू तुम्ही चांगले दिसत आहात ह्या आठवणी ज्यावेळेस विजयसिंह पंडित यांच्या तोंडून बाहेर येत होत्या त्यावेळेस त्यांना हुंदका भरला होता. अश्रू अनावर झाले अत्यंत विश्वासू म्हणून विजयसिंह पंडित यांच्यावर बीड नगर परिषदेची जिम्मेदारी दिली होती ती त्यांनी योग्यरीत्या पार पडली आणि अत्यंत जवळचे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होतं आणि आज अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करताना विजयसिंह पंडित यांना अश्रू अनावर झाले.
- जयश्री थोरात यांनी ट्विट करत दिली प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' माणूस हरपला! प्रशासनावरील पकड आणि जनहितासाठी अहोरात्र कष्ट करणारा एक दूरदृष्टीचा नेता आज आपण गमावला आहे. राज्याच्या सार्वजनिक जीवनासाठी ही कधीही न भरून येणारी हानी आहे.
- बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत दिली प्रतिक्रिया
कुशल प्रशासक आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केले, त्यांच्या जाण्याने एक उमदा नेता आपण गमावलेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
- राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
अजित पवारांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद, दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्राची अपरिमितहानी झाली आहे, असं टोपे म्हणालेत. अजित पवार म्हणजे एक कर्तबगार नेता, संवेदनशील नेता, सामाजिक हित जाणणारा नेता, संघटन कौशल्य असणारा नेता, शिस्तप्रिय नेता, वक्तशील नेता, असं म्हणत टोपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता म्हणून अजित दादांची ओळख होती, असंही टोपे म्हणालेत. दरम्यान, अजित दादा म्हणजे जे बोलेल ते करणारा नेता, असं म्हणत टोपे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
- अजित पवारांच्या मृत्यूनंतर विधानपरिषद आमदार इद्रीस नायकवडी यांना अश्रू अनावर
"अजितदादांच्या निधनाने सर्वांना सोबत घेऊन जाणारा, खरे बोलण्याचे धाडस आणि नैतिकता असणारा नेता हरपला आहे. सर्वांना न्याय देणारा सर्व समजघटकांना सोबत घेऊन चालणाऱ्या नेत्याला आज महाराष्ट्र हरवून बसला आहे. आज अत्यंत काळा दिवस, हा दिवस का उजाडला?" असा प्रश्न विचारत अतिशय भावुक होतं इद्रीस नायकवडी यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमासमोर व्यक्त केली आहे.
- मनोज जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं आहे की, "आपल्या दादाची दुःखद बातमी कळाली, मनाला पटत नाही... विश्वास बसायला तयार नाही की दादाचं अपघाती निधन झालं. असा नेता होणे नाही..."
- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात बारामतीला रवाना होणार...
- भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया, "अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकल्यावर धक्का बसला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी दिलीय. विकासाचं ध्यास असणारं नेतृत्व आज आमच्यातून गेलेलो आहे, अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली आहे. आज महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं असून महाराष्ट्राला अजितदादांची कायम आठवण राहील, अशी भावना व्यक्त करत दानवे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे."
- अजित पवारांविषयी विजय वड्डेटीवार यांची भावूक प्रतिक्रिया, "अजित दादा हे राजकारणात शब्द पाळणारे कुशल प्रशासक होते. जे होणार नाही ते स्पष्ट सांगणार..जे होणार ते काम करणार असे स्पष्टवक्ता नेते होते. मी ज्यावेळी मंत्रिमंडळात पहिल्यांदा आलो तेव्हा मी त्यांचा राज्यमंत्री होतो. त्यांनी विभागाचे कामकाज कसे वागायचे याचे धडे त्यांनी मला दिले. त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. 25 वर्षे त्यांच्याबरोबर काम केले. आज महाराष्ट्राच्या मातीतला मोठा नेता गमावला आहे. कल्पना पलीकडचे हे घडले आहे. एका लोकनेत्याला महाराष्ट्राने गमावले आहे."
-वरळीतील सेन्चुरी क्वार्टरमधील रहिवासी असलेल्या श्री शिवकुमार माळी यांची कन्या श्रीमती पिंकी माळी यांचं या विमान अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंकी माळी या अपघातग्रस्त विमानात क्रू मेंबर होत्या.
- भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना अश्रू अनावर. अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की, "पवार कुटुंबियांचे आणि आमचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. राजकीय परिस्थिती बदलली असेल परंतु आमच्यातील नाते कधी कमी झाले नाही. अजित दादा महाराष्ट्राचे धाडसी नेतृत्व होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे राज्याची फार मोठी हानी झाली आहे."
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला रवाना
- अजित दादांच्या दुःखद निधनाच्या घटनेवर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर, अजित दादांची आठवण सांगत आमदार खोतकर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दादांच्या मृत्यूची घटना मनाला चटका लावणारी आहे, असं म्हणत महाराष्ट्र आज पोरका झाला, अशी भावना जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे.
- कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया, "अतिशय स्पष्ट वक्ता, नेता म्हणून त्यांच्याकडे पहिलं जात होतं. कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारे ते नेते होते. असं होऊ नये, महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही. मी देखील राष्ट्रवादीत काम केलं आहे. पवार कुटुंबाच्या खूप जवळ होतो , धनंजय महाडिकना मुन्ना म्हणू नका कारण ते खासदार आहेत, असं त्यांचं एका भाषणात वक्तव्य होतं हे कार्यरक्त्यावरच प्रेम होतं."
- अजित दादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी अपघाताचे वृत्त समजताच धनंजय मुंडे हे तातडीने बारामती कडे रवाना झाले असून प्रवासादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, "माझे वडील गेल्यानंतर दादानी कधी वडिल नाहीत याची जाणीव होऊ दिली नाही."
- आमचा कुटुंब प्रमुख गेला अशा भावनिक प्रतिक्रिया माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केले आहे. अजित दादांच्या खूप मोठ्या आठवणी आहेत. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह माजलगाव मतदार संघाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आमदार सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
- अमरावतीच्या राष्ट्रवादी आमदार सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं की, "आमच्या नेत्याचे निधन खूप वेदनादायक आणि दुःखद आहे आणि मी यासंदर्भात अधिक काही बोलू शकत नाही."
- अजित पवारांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी "उद्धवस्त" असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून शोक व्यक्त केला.
- कोल्हापूर आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, "महाराष्ट्रासाठी हा वेदनादायी दिवस आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अशा पद्धतीने मृत्यू झाला आणि यावर बोलण्यासाठी काही शब्द नाहीयेत. कर्तृत्व आणि नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे."
- अजित पवारांबद्दल पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, "अजित पवार जी हे लोकनेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी चांगले संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जायचा. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
- विमान अपघाताबाबत मोदींची X वरील प्रतिक्रिया, "महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताने दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझे विचार आहेत. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो अशी प्रार्थना करतो."
- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यूनंतर अनिल देशमुख यांना अश्रू अनावर झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात- "कुशल प्रशासक आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केले, त्यांच्या जाण्याने एक उमदा नेता आपण गमावलेला आहे."
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया- "ज्यांच्या जीवावर आम्ही राजकारण केल ते दादाचं आम्हाला सोडून गेले."
- भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमानात अजित पवार यांच्यासह आणखी 2 कर्मचारी (1 पीएसओ आणि 1 अटेंडंट) आणि 2 क्रू (पीआयसी+एफओ) सदस्य होते. सुरुवातीच्या माहितीनुसार, या अपघातात कोणीही वाचलेलं नाही.
- सुरुवातीच्या माहितीनुसार, या अपघातात कोणीही वाचलेले नाही.
- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते बारामतीला पोहोचणार
- विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
- सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीला रवाना
- या दुर्घटनेत विमानातील काही जण जखमी झाल्याचे वृत्त असून, अजित पवार यांनाही गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार हे बारामती आज तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी चार वेगवेगळ्या सभांना संबोधित करणार होते. मात्र, अपघातामुळे त्यांचा हा दौरा अर्धवट राहिल्याची शक्यता आहे.
- बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमानाचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. नियंत्रण सुटल्याने हे विमान विमानतळाच्या परिसरातील एका शेतात कोसळले.
ADVERTISEMENT











