Pune News : पुणे जिल्ह्यातील हिंजेवाडी परिसरात अंगनवाडी सेविकेच्या निष्काळजीपणामुळे खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 26 नोव्हेंबर) दुपारी 11 ते 12 या वेळेत दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल 20 लहान मुलांना अंगनवाडीच्या खोलीत बंद करून स्वतः ग्रामपंचायतीच्या बैठकीसाठी निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिक आणि पालक वर्गात संताप उसळला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अंगनवाडी कार्यकर्ती सविता शिंदे आणि सहायिका शिल्पा साखरे यांना ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांनी एका बैठकीसाठी बोलावले होते. त्याच वेळेस अंगनवाडीचे कामकाज सुरू होणार होते. मुलांच्या देखरेखीची कोणतीही व्यवस्था न करता दोन्ही कर्मचारी मुलांना आतमध्ये ठेवून दरवाजाला बाहेरून कुलूप लावून निघून गेल्या. जवळपास एक तास लहान मुले त्या बंद खोलीत एकटीच राहिली. भीती आणि एकटेपणाने त्रस्त झालेली ही मुले मोठ्याने रडत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी 'त्या' आमदाराने 50 कोटी घेतले, भाजप आमदाराने नाव सांगितलं
घटनेविषयी विचारणा केल्यावर दोन्ही कर्मचाऱ्यांनी निष्काळजी उत्तर देत, “माजी सरपंचांनी बैठक बोलावली होती म्हणून आम्ही कुलूप लावलं,” असे सांगितले. मुलांचे रडणे आणि खोलीतून येणारा आवाज ऐकणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मुलशी पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिरम यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. अधिकारी गिरम यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ बैठक सोडून परत येण्याचे निर्देश दिले. आदेश मिळताच सेविका आणि सहायिका धावत आंगनवाडीत परतल्या आणि ताळे उघडून मुलांना बाहेर काढले.
या घटनामुळे अंगनवाडी कर्मचाऱ्यांच्या जबाबदारपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लहानग्यांना बंद खोलीत ठेवणे हे त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण करणारे कृत्य ठरू शकते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मुलांना मदत मिळण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती, हे विशेष चिंताजनक आहे.
सरकारी नियमावलीनुसार बालकांची सतत देखरेख आणि सुरक्षितता ही अंगनवाडी कर्मचाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र या घटनेत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे. सध्या या प्रकरणी अधिकृत कारवाई करण्यात आलेली नसली तरी अधिकारी धनराज गिरम यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वस्त केले आहे. या प्रकरणामुळे आंगनवाडी व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणपद्धती आणि मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रशासन किती दक्ष आहे, याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाही, बाळराजेंचं चॅलेंज; आता अजितदादा म्हणाले,'मस्ती आलेल्या..'
ADVERTISEMENT











