Sindhudurg News: राज्यभर निवडणूक निकालांचे जल्लोषाने वातावरण रंगले होते. कुठे विजयाचे फटाके, कुठे पराभवाची शांतता पाहायला मिळाली. पण सिंधुदुर्गातील पिंगुळी येथील शेटकरवाडीमध्ये उधळलेला गुलाल मात्र सत्तेसाठी नव्हता, तर देशसेवेच्या स्वप्नपूर्तीचा होता. हा गुलाल होता कष्ट, संघर्ष आणि मातृत्वाच्या विजयाचा.
ADVERTISEMENT
आनंद गोपाळ सावंत याने आपली सीआरपीएफ (CRPF) विभागात निवड झाल्याचा आनंद कुडाळच्या फुटपाथवर भाजी विकणाऱ्या आपल्या आईसोबत साजरा केला. या दृश्याने क्षणभर उपस्थित लोकांचे सुद्धा डोळे भरून आले. कारण हा केवळ एका तरुणाचा यशस्वी प्रवास नव्हता, तर गरिबीशी झुंज देत, घाम गाळत, स्वप्नांना पंख देणाऱ्या आईच्या त्यागाचा गौरव होता. आईच्या हातातील भाजीची टोपली आणि मुलाच्या डोळ्यांत चमकणारे देशसेवेचे स्वप्न. या दोहोंमधील नातं समाजाला खूप काही सांगून जातं.
आजच्या काळात यशाची मोजणी केवळ पद, पैसा आणि प्रसिद्धीवर केली जाते. मात्र गोपाळच्या यशाने दाखवून दिलं की खरी श्रीमंती ही कष्ट, संस्कार आणि देशप्रेमात असते. फुटपाथवरून थेट देशाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंतचा हा प्रवास लाखो तरुणांना प्रेरणा देणारा आहे. या यशाची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेले अभिनंदन सुद्धा महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे समाजाने अशा यशकथांकडे पाहण्याचा दृष्टीकोन. निवडणूक निकाल काही दिवस चर्चेत राहतात, मात्र गोपाळसारख्या तरुणांच्या कथा पिढ्यान् पिढ्या प्रेरणा देत राहतात.
हे ही वाचा: 'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण'वर कोणाचा हक्क? सुप्रीम कोर्टात शिंदे vs ठाकरेंमध्ये Final सुनावणी
खरं तर हा गुलाल एका घरापुरता मर्यादित नाही. तो प्रत्येक कष्टकरी आईचा आहे, प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा आहे आणि देशसेवेसाठी झटणाऱ्या प्रत्येक जवानाचा आहे. शेटकरवाडीतील हा आनंदाचा क्षण आपल्याला एवढंच शिकवतो की, देश घडतो तो सत्तेच्या खुर्चीवरून नव्हे, तर रस्त्यावर घाम गाळणाऱ्या हातांतून आणि गणवेशात उभ्या असलेल्या छातीतून.
ADVERTISEMENT











