Crime News : मुलांना शाळेत खोटं बोलू नये, प्रामाणिकपणा हे जगण्यातील महत्त्वपूर्ण मूल्य आहे अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. पण शाळेतील शिक्षकच या विरोधात वागत असतील तर? अशीच ही घटना आहे. एका मुख्याध्यापकाने शाळेतील विद्यार्थ्यांवरच चोरीचे खोटे आरोप केले. त्यांनी चोरी केली नसल्याचं खूपदा सांगितलं, पण तो मुख्याध्यापक ऐकायलाच तयार नव्हता. शेवटी ते विद्यार्थी पोलिस स्टेशनला पोहोचले. पण तिथंही त्यांची दाद घेण्यात आली नाही, यानंतर पुढं काय घडलं, जाणून घेऊया. छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातील करंजवार पूर्व माध्यमिक शाळेतील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भाजपच्या माजी नगरसेवकाने चौथे लग्न केले; नाराज मुलाने सावत्र आईला भर रस्त्यातच भोसकले
गुन्हा मान्य करा अन्यथा..
26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी एक छोटा स्पीकर शाळेत आणण्यात आला. मात्र तो अचानक गहाळ झाला. या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक राजेश प्रसाद यादव यांनी कोणताही पुरावा नसताना या निष्पाप मुलांवर चोरीचा संशय व्यक्त केला आणि त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देत मानसिकदृष्ट्या छळण्यास सुरुवात केली. मुख्याध्यापकांनी मुलांवर चोरीची कबुली देण्यासाठी प्रचंड दबाव टाकला आणि त्यांना धमकी दिली की, जर त्यांनी गुन्हा मान्य केला नाही तर त्यांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC) कापून त्यांना शाळेतून काढून टाकले जाईल. इतकेच नव्हे तर, या विद्यार्थ्यांना परिसरातील इतर कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही, अशी भीतीही त्यांना घालण्यात आली. मुख्याध्यापकांच्या या धमक्यांमुळे मुलांचे भविष्य टांगणीला लागले आणि ती प्रचंड मानसिक तणावाखाली आली. शाळेत शिक्षकांची दहशत आणि घरी पालकांची समज यामुळे हतबल झालेल्या या मुलांनी अखेर रडत रडत पायी चालत प्रतापपूर पोलीस ठाण्याची पायरी चढली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी केली तडजोड
पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या या रडणाऱ्या मुलांनी आपली व्यथा मांडली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यांतही पाणी आले. मात्र, या गंभीर प्रकरणात पोलिसांची भूमिका अत्यंत उदासीन आणि वादग्रस्त ठरली आहे. मुलांच्या मानसिक स्थितीचा विचार करून मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याऐवजी, पोलिसांनी हा एक सामान्य वाद असल्याचे मानले. पोलिसांनी मुख्याध्यापकांना ठाण्यात बोलावून घेतले आणि दोन्ही बाजूंमध्ये केवळ 'तडजोड' घडवून आणत प्रकरणावर पडदा टाकला. कोणत्याही ठोस चौकशीविना किंवा मुलांच्या भविष्याची खात्री न घेता त्यांना पुन्हा त्याच वातावरणात परत पाठवण्यात आले.
हे ही वाचा : बीड : नाव चुकीचे सांगितले, पण आडनावावरुन सगळं समोर; पीएसआय पल्लवी जाधव यांनी कसा रोखला 'तो' बालविवाह?
मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी
या घटनेमुळे शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक आणि शिक्षणतज्ज्ञांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षणाच्या मंदिरात विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गुन्हेगारांसारखी वागणूक देणे आणि त्यांचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात केवळ तडजोड न करता दोषी मुख्याध्यापकांवर कडक विभागीय आणि कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
ADVERTISEMENT











