Crime News : प्रतापगडचा रहिवासी असलेल्या 30 वर्षीय विष्णू यादव याने चार वर्षांपूर्वी साक्षी सिंहसोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नामुळे साक्षीचे वडील तीर्थराज सिंह प्रचंड संतापलेले होते. चार वर्षे उलटल्यानंतर आणि या दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगी असूनही तीर्थराज यांच्या मनातील राग कमी झाला नव्हता. मंगळवारी रात्री विष्णू पहिल्यांदाच आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलीसह सासरी पाऊल ठेवले. मात्र, ही भेट आनंदाची ठरण्याऐवजी रक्तरंजित ठरली. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि रागाच्या भरात तीर्थराज सिंह व त्यांच्या मुलींनी विष्णूवर जीवघेणा हल्ला केला. यातच त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील आशियाना सेक्टर-1 मध्ये 17 मार्चच्या रात्री ही घटना घडली.
ADVERTISEMENT
चार वर्षांच्या सूडाचा थरार: लाकडी दांडक्याने केली हत्या
विष्णू आणि साक्षीने 2022 मध्ये कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले होते. व्यवसायाने वकील असलेल्या तीर्थराज सिंह यांना हे नाते कधीच मान्य नव्हते. घटनेच्या रात्री जेव्हा विष्णू सासरी पोहोचला, तेव्हा जुन्या आठवणींवरून वाद उफाळून आला. रागाच्या भरात सासरा आणि मेहुणीने मिळून लाकडी दांडग्याने विष्णूच्या डोक्यावर सपासप वार केले. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे विष्णूचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना विष्णूची पत्नी साक्षी आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीसमोर घडली. आपली पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी गयावया करत राहिली, पण नराधम बाप आणि बहिणींच्या क्रूरतेपुढे तिचे काहीच चालले नाही.
हेही वाचा : 'रुपाली चाकणकरांना अटक करुन नार्को टेस्ट करा' सुषमा अंधारेंची मागणी; एकनाथ शिंदेंविषयी काय म्हणाल्या?
पोलिसांची कारवाई आणि आरोपींना बेड्या
या घटनेची माहिती मिळताच आशियाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे आणि हत्येसाठी वापरलेला लाकडी दांडा जप्त केला आहे. मुख्य आरोपी तीर्थराज सिंह आणि त्यांच्या चार मुलींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, तीर्थराज यांचे कुटुंब गेल्या 10-12 वर्षांपासून या भागात भाड्याने राहत होते आणि शेजाऱ्यांनीही विष्णूला पहिल्यांदाच त्यांच्या घरी येताना पाहिले होते. या धक्कादायक हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, 4 वर्षांनंतरही प्रेमविवाहाचा इतका द्वेष असू शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रेमविवाहासारख्या वैयक्तिक निर्णयाचा अशा प्रकारे हिंसक अंत होणे, हे समाजाच्या मानसिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. एका चिमुकल्या मुलीच्या डोक्यावरून पित्याचे छत्र कायमचे हरपले असून, पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. चार वर्षांचा काळ लोटल्यानंतरही सासरच्या मंडळींच्या मनात असलेली नफरत इतकी टोकाची होती की, त्यांनी रक्ताच्या नात्याचीही पर्वा केली नाही. या घटनेमुळे संपूर्ण लखनौ हादरले असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर...' अनामिका का कापली जाते? सुषमा अंधारेंनी काय सांगितले?
ADVERTISEMENT











