Crime News : इंदूरच्या राऊ परिसरातील न्यू नेहरू नगरमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी धक्कादायक घटना घडली. 21 वर्षीय वंदना पटेल हिची तिची जाऊ पार्वती बाई कुशवाह हिने चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वंदनाचा मृतदेह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या हौदात टाकण्यात आला. शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा आढळल्यानंतर पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता पार्वती बाईच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. फुटेजमध्ये ती पती भूपेंद्र पटेलसोबत घरातून बाहेर पडताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि अरबिंदो रुग्णालयातून तिला ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, शेवटच्या श्रावणी सोमवारी कसं असेल वातावरण?
एका टिप्पणीवरून दोघींमध्ये वाद सुरू झाला, अन् हत्येपर्यंत पोहोचला
पोलिसांच्या चौकशीत वंदना आणि पार्वती यांच्यात तिच्या भावावरून वाद झाल्याचे समोर आले. पार्वतीचा भाऊ एका प्रकरणात दमोहच्या तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रक्षाबंधनाच्या दिवशी वंदनाने पार्वतीच्या भावाबाबत केलेल्या एका टिप्पणीवरून दोघींमध्ये वाद सुरू झाला. घरात त्या वेळी पार्वती आणि वंदना या दोघीच होत्या. पार्वतीची मुले शाळेत गेली होती, तर तिचा पती आणि देवर रुग्णालयात दाखल होते. याचदरम्यान वाद वाढत गेला आणि आरोपानुसार पार्वतीने चाकूने वंदनाच्या मानेवर सलग दोन वार केले. गंभीर दुखापतीमुळे वंदनाचा मृत्यू झाला.
हेही वाचा : कराड: दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध, साथीदाराच्या मदतीने बॉयफ्रेंडला संपवलं
मृतदेह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या हौदापर्यंत ओढत नेला अन्...
हत्येनंतर पार्वतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. तिने वंदनाचा मृतदेह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या हौदापर्यंत ओढत नेऊन त्यात टाकला. त्यानंतर तिने सर्व काही सामान्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णालयात दाखल असलेल्या पतीची भेट घेण्यासाठी ती रुग्णालयातही गेली. दरम्यान, वंदना अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या शोधासाठी यापूर्वी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. वंदनाने 11 ऑगस्ट रोजी उपेंद्रसोबत मंदिरात प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे कुटुंबात नाराजी होती. तसेच वंदनाच्या नशेच्या सवयीबाबतही कुटुंबीय नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर उपेंद्रने नेहरू नगर सोडून राजनगरमध्ये भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली होती.
वंदनाच्या शोधादरम्यान पोलिसांनी हत्या झाल्याच्या शक्यतेने तपास पुढे नेला आणि CCTV फुटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. चौकशीत सुरुवातीला पार्वतीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या जबाबातील विसंगती समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी अधिक तीव्र केली. पोलिसांनी हत्येत वापरलेल्या चाकूशी संबंधित फिंगरप्रिंट मिळाल्याचे सांगितल्यानंतर पार्वतीने वंदनाच्या हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तिच्या मृतदेहावर असलेल्या खुणांवरुन हत्येत वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला. डीसीपी नरेंद्र सिंह रावत यांनी राऊ परिसरातील या हत्येचा उलगडा झाल्याचे सांगितले. पोलिसांनी पार्वती बाई कुशवाह हिला अटक केली असून हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील वैधानिक कारवाई सुरू आहे. वंदनाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. अवघ्या महिनाभरापूर्वी झालेल्या प्रेमविवाहानंतर वंदनाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT












