जळगाव : जळगावमधील हरी विठ्ठल नगरातील भैय्या पाटील यांच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या तपासाला नाट्यमय वळण मिळालं आहे. लग्नाचा बनाव रचून फसवणूक केल्याप्रकरणी भैय्या पाटील यांची मुलगी प्रियंका पाटीलसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यापैकी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात भैय्या पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> गाडीवर भारत सरकारचा बोर्ड, IAS असल्याचं ओळखपत्र दाखवून सगळ्यांना गंडवलं, पोलिसांनी कसं पकडलं?
कोल्हापुरातील तक्रारीनंतर आरोपी ताब्यात
कोल्हापूर येथील आशिष गंगाधरे यांच्या तक्रारीनुसार, प्रियंका पाटील व इतरांनी लग्नाचा बनाव रचून दोन लाख रुपये आणि चार तोळे सोने उकळल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासात, जळगावातील एक टोळी अशा प्रकारे अनेक ठिकाणी लग्नाचा बनाव रचून फसवणूक करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आरोपींवर आधीही असेल गुन्हे, मोठं रॅकेट?
यातील आरोपी मनिषा जैन आणि सुजाता ठाकूर यांच्यावर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना अटक केली असून, इतर ठिकाणीही अशा फसवणुकीच्या घटना घडल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
भैय्या पाटील यांनी स्वत:ला का संपवलं?
आपल्या अल्पवयीन मुलीची कामाच्या बहाण्यानं विक्री केल्याचं सुरूवातीला समोर आलं होतं. मुलीचं कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचं लैंगिक शोषण केलं असंही आरोपींनी सुरूवातीला भासवलं. तसंच यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. अतिशय गुंतागुंतीच्या या प्रकरणात आपल्या मुलीबद्दल घडलेल्या गोष्टी सहन न झाल्यानं भैय्या पाटील यांनी स्वत:ला संपवल्याची माहीती समोर आली आहे.
हे ही वाचा >> भाजप नेत्याचे हात-पाय बांधून चिखलाने घातली आंघोळ, महिलांनी असं केलं तरी का?
दरम्यान, मनीषा पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत जळगाव आणि कोल्हापूर येथील आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.या प्रकरणाने जळगावात खळबळ उडाली असून, पोलिसांचा तपास पुढे काय उघड करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
