Crime News : एका शेतकऱ्याच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. हाठी गावात ट्यूबवेलवर झालेल्या दारू पार्टीच्या रात्रीनंतर शेतकरी हरमोहन यादव यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणात मृताच्या अर्जुन, मुलायम आणि श्याम या तीन मित्रांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगत नव्याने तपास करण्याची मागणी केली होती.
ADVERTISEMENT
दुखापतीच्या खुणा दिसल्याने संशय बळावला
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसीपी आशुतोष सिंह यांनी नव्याने तपास सुरू केला. तपासादरम्यान गावातील एका तरुणाने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. घटनेच्या रात्री शेजारच्या शेताचा मालक धर्मेंद्र यादव गायब असल्याचे तसेच दुसऱ्या दिवशी त्याच्या हातावर दुखापतीच्या खुणा असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हरमोहन यांच्या अंत्ययात्रेत आणि स्मशानभूमीपर्यंत धर्मेंद्र उपस्थित होता, त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी तो आपल्या कुटुंबासह सासरी निघून गेल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. तपासात असेही उघड झाले की, काही दिवसांपूर्वी हरमोहन यांनी धर्मेंद्रवर 900 रुपये चोरी केल्याचा आरोप करत त्याचा फावडा आणि कुदळ उचलून नेली होती.
हेही वाचा : 'तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागा', लाठीचार्जवरुन राहुल गांधी पीएम मोदींवर भडकले
गावात आपली बदनामी झाल्याचा राग
पोलिसांनी धर्मेंद्रला त्याच्या सासरच्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, सुमारे महिनाभरापूर्वी त्याने हरमोहन यांना गावातील एका महिलेसोबत ट्यूबवेलवर संबंध ठेवताना पाहिले होते. ही बाब हरमोहन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धर्मेंद्रवर दबाव आणण्यास सुरुवात केली. गावभर धर्मेंद्रने 900 रुपये चोरल्याची अफवा पसरवण्यात आली आणि त्याचा फावडा व कुदळही काढून घेण्यात आली. त्यामुळे गावात आपली बदनामी झाल्याचा राग त्याच्या मनात होता. दरम्यान, दारू पार्टीदरम्यान हरमोहन यांचा मित्रांशी वाद झाल्याचे पाहून संशय थेट मित्रांवर जाईल, असा विचार करून धर्मेंद्रने बदला घेण्याची संधी साधली. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली.
धर्मेंद्रने पोलिसांना सांगितले की, हरमोहन झोपल्यानंतर त्याने प्रथम काठीने त्यांच्या डोक्यावर वार केला आणि त्यानंतर फावड्याने गळ्यावर घाव घालून त्यांची हत्या केली. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर डीसीपी पूर्व सत्यजीत गुप्ता यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सुरुवातीला तिघा मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र वैज्ञानिक आणि मॅन्युअल इंटेलिजन्सच्या आधारे खरा आरोपी धर्मेंद्र यादव याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने अवैध संबंधाच्या घटनेनंतर झालेल्या वादाचा आणि 900 रुपये चोरीच्या खोट्या आरोपातून झालेल्या बदनामीचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याची कबुली दिली. हत्येत वापरलेला फावडाही जप्त करण्यात आला असून सुरुवातीला संशयित ठरलेले तिन्ही मित्र निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आले.
ADVERTISEMENT












