Latur News : लातूर जिल्ह्यातील पेठ गावच्या शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. प्रेम प्रकरणाला घरच्यांचा विरोध सहन न झाल्याने एका नर्स महिलेने आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने एकत्र आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दरडवाडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये नितीन दराडे आणि राणी दराडे (दोघेही रा. दरडवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड) अशी आत्महत्या प्रेमी युगुलाची नावे आहेत.
ADVERTISEMENT
घरच्यांनी प्रेमाला केलेला विरोध सहन झाला नाही, दोघांनी आयुष्य संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन दराडे हा शारीरिकदृष्ट्या अपंग असला तरी तो मेहनती स्वभावाचा होता. तो अहमदपूर येथे राहून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एमपीएस्सीच्या तयारीत व्यस्त होता. दुसरीकडे, राणी दराडे ही व्यावसायिक नर्स असून लातूरमधील एका खासगी रुग्णालयात काम करत होती. दोघेही नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यात आधीपासूनच ओळख होती. हळूहळू ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली. मात्र, दोघांच्या नात्याला घरच्यांनी विरोध दर्शवला. या विरोधामुळे मानसिक ताण निर्माण झाला आणि अखेर या जोडप्याने एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा : अजितदादांकडून खेचून आणून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं तिकीट दिलं, तोच माजी आमदार आता भाजपात प्रवेश करणार
घटनेच्या ठिकाणी दोघांचे मृतदेह पत्र्याच्या खोलीत आढळले. एका बाजूला नितीनने गळफास घेतल्याचे आणि त्याच खोलीत राणीनेही स्वतःचा जीव घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. “कायमचं एकत्र राहण्यासाठी” या भावनेतून दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहून तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये याबद्दल तीव्र चर्चा सुरू आहे. नितीनने अपंगत्वावर मात करून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवण्याचा प्रयत्न केला होता, तर राणीने वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. दोघेही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी झगडत होते. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधाने आणि समाजातील दडपणामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
या घटनेने त्यांच्या नातेवाईकांवर आणि गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षित आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या दोन तरुणांच्या अशा अंताने “प्रेमाला समाजात अजूनही स्वीकृती नाही” या वास्तवाची जाणीव पुन्हा एकदा झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
