शेजाऱ्यांचा वाद विकोपाला, चाकू- कोयते काढले, गुप्ता आणि शेख कुटुंब भिडलं, तिघांचा मृत्यू... प्रकरण काय?

Mumbai News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसरमधील गणपत पाटील नगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबांमध्ये 2022 मध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात टोकाचे वाद होते. 

Mumbai Tak

मुंबई तक

20 May 2025 (अपडेटेड: 20 May 2025, 02:48 PM)

follow google news

Dahisar Crime News : मुंबईतील दहिसरमध्ये काल एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे.  दहिसर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीतील गणपत पाटील नगर परिसरात दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही कुटुंबांनी भांडणात थेट चाकू आणि कोयत्यांनी हल्ले केले. या गंभीर घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. जुन्या वादावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणाचं रुपांतर जोरदार हाणामारीत झालं आणि त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर आहे. 

हे वाचलं का?

हमीद शेख (वय 49), रमणलाल गुप्ता (वय 50) आणि अरविंद गुप्ता (वय 23) अशी तीन मृतांची नावं आहेत. हे सर्वजण गणपत पाटील नगर येथील रहिवासी आहेत. रविवार जुन्या वादातून दोन्ही कुटुंबांचे वाद झाले आणि दुकानदार असलेल्या दोघांनी एकमेकांवर चाकू आणि विळ्यानं हल्ला केला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ, कुणाला बसणार धक्का? राजकीय घडामोडींचा अर्थ काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएचबी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणपत पाटील नगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबांमध्ये 2022 मध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्यात टोकाचे वाद होते. 

रविवारी संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास, लेन नंबर 14 मध्ये त्यांच्या नारळाच्या दुकानासमोर अमित शेख आणि राम नवल गुप्ता यांच्यात दारू पिऊन वाद झाला. दोघांनीही त्यांच्या मुलांना बोलावलं. यानंतर, गुप्ता, त्यांचे पुत्र अमर गुप्ता, अरविंद गुप्ता आणि अमित गुप्ता आणि हमीद नसिरुद्दीन शेख आणि त्यांचे पुत्र अरमान हमीद शेख आणि हसन हमीद शेख यांच्यात तुफान हाणामारी झाली.

हे ही वाचा >> कष्टानं पिकवलेलं डोळ्यासमोर वाहून गेलं, 'त्या' शेतकऱ्याला थेट केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचा फोन, म्हणाले...

या हल्ल्यात राम नवल गुप्ता (वडील) आणि अरविंद गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर अमर गुप्ता आणि अमित गुप्ता जखमी झाले. हमीद शेख यांचाही यामध्ये मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा अरमान शेख आणि हसन शेख जखमी झाले आहे. शताब्दी रुग्णालयातून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही कुटुंबातील लोकांवर मर्डरचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी जखमी असल्यानं अटकेची प्रक्रिया अजून बाकी आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    follow whatsapp