Crime News: मध्य प्रदेशातील धार येथून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. कुक्षी पोलीस स्टेशन परिसरातील अली गावात एका पाच वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोपी तरुणाने पीडित मुलाच्या घरात घुसून त्याचा खून केल्याचं सांगितलं जात आहे. हत्या करणारी व्यक्ती ही मानसिक दृष्ट्या विक्षिप्त असल्याची माहिती आहे. शुक्रवारी (26 सप्टेंबर) आरोपीने विकास नावाच्या पाच वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
धारदार शस्त्राने मुलाच्या गळ्यावर वार...
महेश नावाचा 25 वर्षीय आरोपी तरुण बाईकवरून आला आणि तो थेट कालू सिंगच्या घरात घुसला. त्यावेळी आरोपी तरुणाने कोणताच विचार न करता घरात ठेवलेलं एक धारदार शस्त्र उचललं आणि 5 वर्षांच्या निष्पाप मुलावर हल्ला केला. त्यावेळी एका झटक्यात मुलाचं डोकं धडापासून वेगळं झालं. इतकेच नव्हे तर, आरोपीने मुलाच्या खांद्यावर सुद्धा धारदार शस्त्राने वार केला. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी महेश पीडित मुलाच्या कुटुंबियांना ओळखत नव्हता.
हे ही वाचा: डोंबिवलीतील 21 वर्षीय तरुणाची 11 व्या मजल्यावरुन उडी, आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर
शेजाऱ्यांकडून आरोपीला बेदम मारहाण
संबंधित मुलाच्या आईने आपल्या मुलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आईसुद्धा जखमी झाली. महिलेचा आवाज ऐकून शेजारी सुद्धा घरी लगेच धावत आले आणि आरोपीला पकडून बेदम मारहाण केली. मात्र, मुलाच्या मृत्यूमुळे आईला मोठा धक्का बसला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची अपडेट! 'इतक्या' स्थानकांचं काम पूर्ण... रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती
वाटेतच आरोपीचा मृत्यू...
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या मारहाणीमुळे गंभीररित्या जखमी झालेल्या आरोपीला रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तसेच, मृत्यूमागचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आल्यानंतर समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महेश मानसिक आजाराने ग्रस्त असून तो अलीराजपुर जिल्ह्यातील जोबट बागडी येथील रहिवासी होता. आरोपी तरुणाची मानसिक प्रकृती ठिक नसून तो मागील बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असल्याचं आरोपीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. पीडित मुलाच्या हत्येच्या एक तासापूर्वी आरोपीने जवळच्या दुकानातून सामान चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं जात आहे. अल्पवयीन मुलाच्या हत्येमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
