Akola : हुंडा घेणारे नामर्द आहेत, असं माझं वैयक्तिक मत असल्याचं मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केलंय. जर स्त्री जर टिकली नाही तर, समाज कसा टिकेल? बायकोला लक्ष्मी म्हणून घरात आणायची. तिने आपल्याला लेकरांना जन्म द्यायचा. तिने आपल्या लेकरांवर संस्कार करायचे. मग ती येताना आपण तिच्या बापाकडे भिकमाग्या असल्याप्रमाणे पैसे का मागायचे? असा सवाल मकरंद अनासपुरे यांनी केलाय. ते आज अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निंबा फाटा येथे एका सभेत बोलत होते. निंबा फाटा येथे 'अंदुरा ऍग्रो प्रोड्युसर कंपनी'च्या वतीने 'कुणबी स्नेहमिलन सोहळा' आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतंय. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री गिरिजा ओक उपस्थित होत्या.
ADVERTISEMENT
मराठी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील अभिनेते म्हणून मकरंद अनासपुरे यांची ओळख आहे. आपल्या चित्रपटातून अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आणि नाना पाटेकरांनी एकत्रित 'नाम फाउंडेशन'ची स्थापना केलीय. निंबा फाटा येथे आयोजित या कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले.
देशात शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नसल्याचं यावेळी अनासपुरे म्हणाले. याशिवाय कापूस आणि सोन्याच्या भावातील तफावतीवरही त्यांनी परखडपणे भाष्य केलंय. जर सोन्याचे भाव लाखाच्या वर गेले असतील. तर कापसाचा भाव आणखीनही कमी कसा?, हा सवाल त्यांनी सरकारला केलाय .
दरम्यान, शेतकऱ्यांना उद्योजकांचा दर्जा का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कर वसुली करू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. चित्रपट अभिनेत्री गिरीजा ओक यांनीही सध्याच्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, असं आवाहन केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
