यंदाही पायी वारी नाहीच, देहू-आळंदी पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला १०० जणांना परवानगी

मुंबई तक

• 06:51 AM • 11 Jun 2021

महाराष्ट्रातील लाखो वारकरी संप्रदासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या वारीबद्दल आज पुण्यात निर्णय घेण्यात आला. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत पालखी सोहळ्याबद्दही चर्चा झाली. यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली असून मानाच्या १० पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे. याचसोबत देहू आणि आळंदी येथून सुरु होणाऱ्या पालखी […]

Mumbai Tak
Google CTA

महाराष्ट्रातील लाखो वारकरी संप्रदासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या वारीबद्दल आज पुण्यात निर्णय घेण्यात आला. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत पालखी सोहळ्याबद्दही चर्चा झाली. यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली असून मानाच्या १० पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

याचसोबत देहू आणि आळंदी येथून सुरु होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याला १०० तर इतर ८ पालखी प्रस्थान सोहळ्याला ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पालखीला यंदाही दोन बस देण्यात येणार असून सर्व नियमांचं पालन करुनच यंदाचा सोहळा आयोजित होईल असं अजित पवारांनी सांगितलं.

हे छा-छू काम आहे, Pune Police मुख्यालयातील बांधकामावर Ajit Pawar नाराज

असा असेल यंदाचा पालखी सोहळा –

  • पालखी यंदाही बसमधूनच पंढरपूरला जाणार, ज्यासाठी शासन लवकरच अधिकृत आदेश जाहीर करेल

  • इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक

  • काला आणि रिंगण सोहळ्याला यंदा परवानगी नाही

  • रथोत्सवासाठी यंदा फक्त १५ वारकऱ्यांना परवानगी

  • प्रत्येक पालखीसोबत फक्त ४० वारकरी असतील

मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपुरात होईल. वाखरीजवळ वाहनं पोहचल्यानंतर पुढील दीड किलोमिटरचं अंतर प्रतिकात्मक स्वरुपात पायी गाठण्याची परवानगी पालख्यांना देण्यात आली आहे. पंढरपूरचं मंदीर यावेळी दर्शनासाठी खुलं करण्यात येणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

“आषाढीच्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायानं मागणी केली होती. वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत आमची बैठक पार पडली. परंतू कोरोनामुळे सध्याची परिस्थिती पाहता मंत्रीमंडळ बैठकीत फक्त १० प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

असा असेल दहा मानाच्या पालख्यांना क्रम –

१) संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर)

२) संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

३) संत सोपान काका महाराज (सासवड)

४) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

५) संत तुकाराम महाराज (देहू)

६) संत नामदेव महाराज (पंढरपूर)

७) संत एकनाथ महाराज (पैठण)

८) रुक्मिणी माता (कौडानेपूर-अमरावती)

९) संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)

१०) संत चांगटेश्वर (सासवड)