अमरावती हिंसाचार : चिथावणी देणाऱ्या 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती; वाचा काय आहे पोस्टमध्ये?

सौरभ वक्तानिया

• 08:14 AM • 17 Nov 2021

त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या कथित मशिदीच्या तोडफोडीची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या अमरावती, मालेगाव या शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. सर्वाधिक पडसाद उमटले ते अमरावतीत. या प्रकरणी आता 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेड या शहरांमध्ये जो हिंसाचार घडला त्यासाठी या पोस्ट कारणीभूत ठरल्या होत्या. या सगळ्या पोस्ट चिथावणी देणाऱ्या आहेत असं […]

Mumbaitak
follow google news

त्रिपुरा या ठिकाणी घडलेल्या कथित मशिदीच्या तोडफोडीची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या अमरावती, मालेगाव या शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. सर्वाधिक पडसाद उमटले ते अमरावतीत. या प्रकरणी आता 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेड या शहरांमध्ये जो हिंसाचार घडला त्यासाठी या पोस्ट कारणीभूत ठरल्या होत्या. या सगळ्या पोस्ट चिथावणी देणाऱ्या आहेत असं सायबर शाखेच्या पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे या पोस्टमध्ये?

एकूण 36 पैकी 25 पोस्ट ट्विटरवर आहेत. सहा पोस्ट फेसबुक आणि इतर पाच पोस्ट ट्विटरवर आहेत. या पोस्टमुळेच हिंसाचार पेटला. सायबर सेलने यासंदर्भातला अहवाल सादर केला आहे. या मध्ये नमूद करण्यात आलं आहे की हिंसाचार माजवण्यासाठी. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे चुकीचा प्रोपगंडा राबवला गेला. या सगळ्या पोस्टमधून चिथावणी देण्यात आली होती ज्यामध्ये हिंसाचार उसळला.

अमरावती हिंसाचार प्रकरण : भाजपा नेते प्रवीण पोटेंसह दहा जण शरण; पोलिसांनी केली अटक

‘सोशल मीडिया मॉनिरिटिंग रिपोर्ट’ असं नाव या रिपोर्टला देण्यात आलं आहे. त्रिपुराची कथित घटना आणि महाराष्ट्रात घडलेल्या हिंसाचाराच्या घटना यामध्ये नमूद आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावरील पोस्ट महाराष्ट्राच्या विविध भागात दंगल घडवण्यासाठी मुद्दाम केल्या गेल्या आहेत. खोट्या बातम्या आणि अपप्रचार पसरवला गेला असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

त्रिपुरा येथील मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी दंगल घडल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातले आदेश जाहीर केले. त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. ज्यात सरकारी मालमत्तेसह पोलिसांच्या गाड्यांची आंदोलनकर्त्यांनी तोडफोड केली होती. अमरावती शहरात प्रशासनाने संचारबंदी लागू केली असून तिकडे सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

त्रिपुरातील हिंसचाराच्या विरोधात मागच्या शुक्रवारी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंद दरम्यान, महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेडात हिंसाचाराचा उद्रेक झाला. नांदेड, अमरावती, मालेगावात जमावाने दुकानांची आणि सार्वजनिक मालमत्तांची तोडफोड केली. त्यामुळे तिन्ही शहरात तणाव पसरला होता. अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचे शनिवारीही पडसाद उमटले. जमावाकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी शहरातील राजकमल चौकात दोन्ही बाजूचे जमाव आमने-सामने आला. यावेळी अनियंत्रित झालेल्या दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. या घटना भाजपने घडवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तर हे सगळं कुणी घडवलं आहे हे नवाब मलिकांना माहित होतं. ते अकारण भाजपवर आरोप करत आहेत असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

    follow whatsapp