बॉम्बे हायकोर्टाने मुंबई महापालिकेला खडसावत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांना राजीनामा मंजूर केल्याचं पत्र आयुक्तांनी लटके यांना द्यावं असं कोर्टानं म्हटलं आहे. या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान ऋतुजा लटके प्रचंड टेन्शनमध्ये होत्या. कोर्टाने हा निर्णय दिल्याने आता त्यांचा अंधेरी पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ADVERTISEMENT
…आणि ऋतुजा लटके यांच्या चेहऱ्यावर उमटलं हसू
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना तिकिट दिलं आहे. मात्र त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचं प्रकरण बॉम्बे हायकोर्टात गेलं होतं कारण मुंबई महापालिकेने त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता.शिंदे गटाने ही खेळी केल्याचं बोललं जात होतं. अशात शिंदे गटाला दणका देत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर इतके दिवस आणि आजही कोर्टात टेन्शनमध्ये दिसणाऱ्या ऋतुजा लटकेंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्या टेन्शन फ्री झालेल्या पाहण्यास मिळाल्या.
नेमकं काय आहे ऋतुजा लटके यांचं राजीनामा प्रकरण?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारीचा निर्णय झाल्यानंतर ऋतुजा लटकेंनी महापालिकेकडे लिपिक पदाचा राजीनामा दिला होता. पहिला राजीनामा नाकारण्यात आल्यानंतर लटकेंनी दुसरा राजीनामा ३ ऑक्टोबर रोजी सादर केला. दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या दुसऱ्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १४ ऑक्टोबर शेवटची तारीख असल्यानं लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
न्यायमूर्ती जमादार यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही महापालिका प्रशासनाचे वकील आणि ऋतुजा लटके यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. ऋतुजा लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याचंही महापालिकेचे वकील साखरे यांनी सांगितलं होतं. तर ऋतुजा लटकेंच्या वकिलांनीही काही मुद्दे उपस्थित करत महापालिकेच्या भूमिका प्रश्न उपस्थित केले.
कोर्टाने काय म्हटलं आहे?
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर महापालिका प्रशासन तथा संबंधित अधिकाऱ्यांना राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिले. उद्या ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र देण्याचे आदेश दिले. त्यावर महापालिकेचे वकील साखरे यांनी १२ पर्यंतचा वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यावर ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी अर्ज दाखल करण्याची वेळ ३ पर्यंतच असल्याचं सांगितलं. त्यावर न्यायालयाने लटके या महापालिकेच्याच कर्मचारी आहेत, त्यांना मदत करा असं सांगितलं.
यावेळी न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. ‘मुंबई महापालिकेला विशेषाधिकार वापरण्याचा अधिकार, पण ऋतुजा लटकेंच्या प्रकरणात महापालिकेचा हेतू योग्य दिसत नाही’, असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलं. त्यामुळे दुसऱ्यांदा महापालिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
ADVERTISEMENT