बायको पाहिजे, पण निवडणूक लढवण्यासाठी; औरंगाबादमध्ये झळकले बॅनर; राज्यभर चर्चा

–इसरार चिश्ती, औरंगाबाद राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याचा शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. औरंगाबाद महापालिकेसाठीही निवडणूक होणार असून, अशातच शहरात झळकलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे अशी चौकाचौकात बॅनरबाजी केली आहे. औरंगाबाद शहरातील रमेश विनायकराव पाटील हे जमीन खरेदी विक्रीचं […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:07 AM • 30 Jan 2022

follow google news

इसरार चिश्ती, औरंगाबाद

हे वाचलं का?

राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याचा शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. औरंगाबाद महापालिकेसाठीही निवडणूक होणार असून, अशातच शहरात झळकलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे अशी चौकाचौकात बॅनरबाजी केली आहे.

औरंगाबाद शहरातील रमेश विनायकराव पाटील हे जमीन खरेदी विक्रीचं काम करतात. त्यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलंही आहेत. हाच त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या मार्गात अडथळा ठरला आहे. त्यावर रमेश पाटील यांनी शक्कल लढवली आणि एका रात्रीत शहरभर उमेदवार बायको पाहिजे म्हणून बॅनर लावले.

औरंगाबाद शहरातील काही चौकांमध्ये हे बॅनर लावण्यात आले असून, त्यावर औरंगाबाद महानगर पालिका निवडणूक 2022. मला तीन मुलं असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. (जातीची अट नाही) वय 25 ते 40. अविवाहित/विधवा/घटस्फोटीत चालेल. फक्त 2 पेक्षा जास्त अपत्य असणारी चालणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे. हे बॅनर लावल्यानंतर पाटील यांना फोनही येऊ लागले आहेत.

रमेश पाटील यांचं म्हणणं काय?

बायको पाहिजेच्या बॅनरबद्दल रमेश पाटील यांनी ‘मुंबई Tak’शी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लढायची आहे, पण आपल्याला तीन मुलं आहेत. त्यामुळे निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे बॅनर लावले आहेत. काल रात्रीपासून आपल्याला लोकांचे फोन येत आहेत. काही लोकांनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.

पाटील मनसेचे कार्यकर्ते

रमेश पाटील मागील अनेक वर्षांपासून मनसेचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहर उपाध्यक्षही आहेत. मात्र, फारसे सक्रिय नसल्याने त्यांना मनसेतील वरिष्ठ नेत्यांना कधी भेटण्याची संधी मिळाली नाही.

‘दुसरं लग्न झालं, तर पत्नीला औरंगाबाद महापालिका निवडणूक लढवायला लावणार आणि जिंकूनही आणणार. पहिल्या पत्नीला या लग्नाबद्दल कोणताही आक्षेप नाही. तिलाही समाजसेवा करायची आहे,’ असं म्हणाले.

प्रत्येक पक्ष नेते आणि त्यांच्या नातेवाईकांनाच निवडणूक उतरवतात. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते वंचित राहतात. दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यानं अशा प्रकारे बॅनर लावून आपण सरकारचा विरोध करत आहात का? असंही पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, ‘सरकारने बनवलेल्या नियमांना माझा विरोध नाही. सरकार आणि न्यायालयाच्या आदेशाचं कधीही उल्लंघन करणार नाही’, असं त्यांनी सांगितलं.

    follow whatsapp