अधिवेशनात आदित्य ठाकरेंची एंट्री, नितेश राणेंनी म्यॉव म्यॉव आवाज काढत डिवचलं

मुंबई तक

• 09:06 AM • 23 Dec 2021

मुंबईतल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध भाजप हा चांगलाच कलगीतुरा पाहण्यास मिळतो आहे. पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे जेव्हा विधानसभेत आले तेव्हा भाजपचे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करत होते. आदित्य ठाकरेंना पाहून नितेश राणे यांनी म्यॉव म्यॉव असा आवाज काढून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली. ठाकरे विरुद्ध राणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला जुना संघर्ष […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध भाजप हा चांगलाच कलगीतुरा पाहण्यास मिळतो आहे. पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे जेव्हा विधानसभेत आले तेव्हा भाजपचे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करत होते. आदित्य ठाकरेंना पाहून नितेश राणे यांनी म्यॉव म्यॉव असा आवाज काढून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

हे वाचलं का?

ठाकरे विरुद्ध राणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला जुना संघर्ष आहे. उद्धव ठाकरेंमुळेच नारायण राणे हे शिवसेनेमधून बाहेर पडले. त्यामुळे आधी हा सामना उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे असा होता. पण आता उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि नारायण राणे यांचे चिरंजीव राजकारणात आल्यामुळे पुढच्या पिढीतही हा परंपरागत संघर्ष आल्याचे दिसत आहे. नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तसेच शिवसेनेवर तोफ डागत असतात.

नेमकं काय घडलं?

आदित्य ठाकरे सभागृहाकडे त्याच पायऱ्यांवरून जात होते जिथे विरोधी आमदार निदर्शने करत होते. ‘आम्ही तिघे भाऊ भाऊ, सगळा माल वाटून खाऊ’ अशा घोषणा भाजपचे आमदार पायऱ्यांवर बसून देत होते. अशातच नितेश राणे यांची नजर आदित्य ठाकरेंवर पडली. आदित्य ठाकरे यांना पाहून नितेश राणेंनी ‘म्याव म्याव’ असा मांजरीचा आवाज काढायला सुरुवात केली. आदित्य ठाकरेंनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते विधिमंडळात दाखल झाले.

काल काय म्हणाले होते नितेश राणे?

‘राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. मुख्यमंत्री आजारी होते ते मी ऐकलं. राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाहीत. राज्य नेमकं कोण चालवतं आहे? मुख्यमंत्री राज्य चालवत आहेत की त्यांनी कुण्या दुसऱ्याकडे चार्ज दिला आहे? कुठे तरी सगळे लोक सांगत आहेत. भविष्यात रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार हे जाहीर करा.’ अशी मिश्किली टिपण्णी नितेश राणे यांनी केली.

एवढंच नाही तर अशी बातमी असेल तर समजून तरी घेऊ. राज्याला मुख्यमंत्री मिळेल या आशेवर राहू. या राज्याचे मुख्यमंत्री कार्यान्वित नाहीत. स्वतःच्या पक्षातील एकाही नेत्यावर ठाकरे कुटुंबीयांचा विश्वास राहिलेला नाही. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी कुणावरही विश्वास राहिलेला नाही. सध्या अधिवेशन सुरू आहे त्याला मुख्यमंत्रीच नसतील तर जनतेची कामं कशी होणार? असाही प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.

    follow whatsapp