वाढत्या रूग्णसंख्येबाबत आणि निर्बंधांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन, म्हणाले….

मुंबई तक

• 04:56 PM • 08 Jan 2022

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. राज्यात वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोर पालन करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसंच जे लोक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य काय म्हणाले […]

Mumbaitak
follow google news

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. राज्यात वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमांचं काटेकोर पालन करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तसंच जे लोक नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

‘कोरोना विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्यासुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. आपल्याला कुठलाही लॉकडाउन करून सगळं ठप्प करायचं नाही. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही. पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करत नियमांचं पालन करावं.’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आता हळूहळू आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे. असाच रुग्णवाढीचा वेग राहिला तर कोमॉर्बिड असलेल्यांना किंवा लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर ऑक्सिजनची मागणीही पुन्हा वाढू शकते.

मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, नर्स ,वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गामुळं आजारी पडलेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे, असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळं समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या. सरकारने घालून दिलेले निर्बंधांना तोडू नका. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या.

काय आहे नवी नियमावली?

पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरता येणार नाही

रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही

लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थिती

अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित राहता येणार

शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद

थिएटर्स, नाट्यगृहं 50 टक्के उपस्थितीची मुभा

सलून आणि खासगी कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा

खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात यावं

पूर्ण लसीकरण झालेल्या सार्वजिनक बसने वाहतूक करण्यास मुभा

हॉटेल, रेस्तराँ रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळ पूर्णतः बंद

महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक

हॉटेल्स रेस्तराँमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलिव्हरी सेवा पूर्णवेळ सुरू राहणार

24 तास सुरू राहणारे कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार

दुकानं, हॉटेल्स रेस्तराँमध्ये काम करणाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेतलेल्या असणं बंधनकारक

लसीचे दोन डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्तराँवर कारवाई केली जाणार

    follow whatsapp