महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लॉकडाउनमुळे राज्यातली रुग्णसंख्या स्थिरावली असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकल्यानंतर शेवटी मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.
ADVERTISEMENT
Break The Chain चे निर्बंध लादल्याने कोरोना महाराष्ट्रात रूग्णसंख्या स्थिरावली-मुख्यमंत्री
राज्यात लॉकडाउन लावण्याच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि भाजपने लॉकडाउनला विरोध केला होता. “आतापर्यंत तुम्ही मला जे सहकार्य केलंत तसंच सहकार्य यापुढेही कराल अशी मला खात्री आहे. माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवलात. मध्यंतरी तुम्हाला भडकावण्याचा प्रयत्न झाला, पण आता मला त्यावर काहीही बोलायचं नाहीये. आपल्या संवादामध्ये मी कधीही कुठेही राजकारण आणणार नाही. जाहीर सभेत मी जरुर राजकारण करेन. जे कोणी गैरसमज पसरवत आहेत त्यांच्यासाठी मी जाहीर सभा नक्की घेऊन उत्तर देईन पण सभा घेण्याची ही वेळ नाहीये”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.
ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात निर्बंध लागू केल्यानंतरच रुग्णसंख्या स्थिरावल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं. लॉकडाउन करु नका आम्ही ते मान्य करणार नाही असं अनेकजण बोलले होते. परंतू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती अशी आली आहे की आपल्याच राज्यात नाही तर आता इतर राज्यांमध्येही लॉकडाउन लावण्याची वेळ आली असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना चिमटा काढला. दरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन बेड पासून ते RTPCR चाचण्यांसाठीच्या प्रयोगशाळा वाढवण्यापर्यंत सर्व बाबतीत राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
