नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष नेमका कधी आणि कसा सुरू झाला?

मुंबई तक

• 02:30 AM • 02 Jan 2022

आदित्य ठाकरे आणि नितेश राणे समोरासमोर आले. त्यानंतर दोघांमध्ये असं काही घडलं की आदित्य ठाकरेंनी थेट वरळी पोलीस स्टेशन गाठलं. त्यापाठोपाठ नितेश राणेंनीही आदित्य ठाकरेंच्या विरोधात काऊंटर कम्प्लेंट केली. तीदेखील त्याच वरळी पोलीस ठाण्यात. काय घडलं होतं या दोघांमध्ये काय होता तो किस्सा माहित आहे? चला जाणून घेऊ. नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, […]

Mumbaitak
follow google news

आदित्य ठाकरे आणि नितेश राणे समोरासमोर आले. त्यानंतर दोघांमध्ये असं काही घडलं की आदित्य ठाकरेंनी थेट वरळी पोलीस स्टेशन गाठलं. त्यापाठोपाठ नितेश राणेंनीही आदित्य ठाकरेंच्या विरोधात काऊंटर कम्प्लेंट केली. तीदेखील त्याच वरळी पोलीस ठाण्यात. काय घडलं होतं या दोघांमध्ये काय होता तो किस्सा माहित आहे? चला जाणून घेऊ.

हे वाचलं का?

नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंना ‘म्याव म्याव’ चिडवणं भोवणार?

आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यात एक भांडण झालं होतं. नुकतंच हिवाळी अधिवेशन पार पडलं. त्यावेळी आदित्य ठाकरेंना उद्देशून नितेश राणे म्याव म्याव आवाज काढला त्यामुळे राजकीय वादळ उठलं. सभागृहातही याचे पडसाद उमटले. नितेश राणेंवर कारवाई करण्याचीही मागणी झाली. सभागृहाच्या बाहेर म्हणजेच अगदी रस्त्यावरही याचे पडसाद उमटले. सोशल मीडियावरही या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया उमटल्या. या दोन नेत्यांमध्ये प्रत्यक्ष असा काहीतरी वाद होण्याची ही पहिली वेळ नव्हती. या दोन तरूण नेत्यांमध्ये असलेल्या वादाचं जे मूळ आहे ते त्यांच्या दोन्ही नेत्यांच्या नेतेच असलेल्या वडिलांमध्ये आहे.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात असलेल्या जुन्या संघर्षाचं, वादाचं मूळ आपल्याला नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातही सापडतं. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करत आणि त्यांना दुषणं देतच ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ते तिकडे निवडूनही आले. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर मालवण मतदारसंघाची जी पोटनिवडणूक झाली त्यामध्येही नारायण राणे विरूद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष पाहण्यास मिळाला होता. नारायण राणेंनी शिवसैनिकांची कशी कोंडी केली अशा अनेक बातम्या त्यावेळेस वाचायला मिळत होत्या. खरंतर नारायण राणे मोठ्या फरकाने ती निवडणूक जिंकले. त्यामुळे अनेकांनी या लढाईत नारायण राणेंची सरशी झाल्याचं सांगितलं.

तरीही उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातला संघर्ष संपला नाही. या दोन नेत्यांमध्ये वारंवार खटके उडत होते. हे दोन नेते समोरासमोर येतील अशा वेळाही खूप आल्या. नुकताच चिपी विमानतळ उद्घघाटन सोहळा पार पडला तेव्हा नारायण राणे विरूद्ध उद्धव ठाकरे असा सामना आपण पाहिलाच. या दोन दिग्गजांमध्ये असलेला वाद पुढे त्यांच्या पुढच्या पिढीत म्हणजेच नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातही झिरपलेला पाहण्यास मिळाला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हातात दोन घड्याळं का घालतात माहित आहे का?

2011 ला काय घडलं होतं?

आदित्य ठाकरे हे नुकतेच पदवीधर झाले होते. त्यांचं वय फारतर 21 वर्षांचं असेल.त्यावेळी नितेश राणे बहुदा आमदार नसावेत. त्यांचंही वय त्यावेळी 28-29 असेल. नारायण राणे हे तेव्हा राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. हे सगळं दोघांमध्ये घडत असताना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंचा वाद होत असताना, कधी मुंबईत कधी कोकणात शिवसेना विरूद्ध काँग्रेस असे राडे पाहण्यास मिळाले. त्यातूनच हा प्रकार घडला होता.

त्यावेळी झालं असं की आदित्य ठाकरेंचे ड्रायव्हर आहेत ठाकूर म्हणून. कॉलेजला जात असताना आदित्य ठाकरे मोठी सुरक्षा बाळगत नसत. त्यांची एक गाडी असे. वांद्रे-वरळी सी लिंकने आदित्य ठाकरे वांद्रे ते मुंबई असा प्रवास करत असत. एकदा आदित्य ठाकरे याच सी लिंकवरून जात असताना आदित्य ठाकरेंच्या कारजवळून एक कॉनव्हॉय चालला होता. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी सी लिंक पार केल्यानंतर त्यांचे ड्रायव्हर ठाकूर यांनी थेट गाडी घेतली ती पोलीस स्टेशनला. त्यांनी तक्रार दाखल केली आमच्या बाजूने जाणाऱ्या एका कारने आम्हाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला वाटलं की ते चुकून झालं असेल पण या कारने आम्हाला कट मारला. पुढे गेल्यानंतर त्या कारने पुन्हा एकदा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. अशा संदर्भातली ही तक्रार होती.

ही तक्रार महत्त्वाची होती कारण आदित्य ठाकरेंचा हा आरोप होता की त्यांना जी कॉनव्हॉयमधली कार कट मारण्याचा प्रयत्न करत होती त्या कारमध्ये नितेश राणे होते. नितेश राणेंनी हे जाणीवपूर्वक केलं आहे असंही आदित्य ठाकरेंनी पोलिसांना सांगितलं होतं. हा हल्ला करण्याचा प्रकार होता असंही सांगण्यात आला. नितेश राणे यांच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा कॉनव्हॉय होता, जो कायमच बघायला मिळाला आहे. ही घटना घडल्यानंतर काही वेळाने नितेश राणेंच्या कॉनव्हॉयमधलाही एकजण त्या पोलीस ठाण्यात आला. तोपर्यंत तिथे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.

राणे विरुद्ध शिवसेना वाद शिगेला : नितेश राणेंविरुद्ध मुंबईत पोस्टरबाजी, भाजपची कारवाई करण्याची मागणी

पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची दखल गंभीरपणे घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे शिकत होते पण त्यांनी हादेखील आरोप केला की या घटनेच्या पूर्वी चार दिवस आधी वरळी भागातूनच माझी कार जात असताना फोर सिझन्स हॉटेलजवळही माझ्या कारला कट मारण्याचा प्रय़त्न झाला होता असं सांगितलं. वारंवार पाठलाग करून कारला आणि मला इजा पोहचवण्याचा प्रयत्न होतो आहे असं सांगण्यात आलं. त्यावेळी वातावरण खूप तापलं होतं. पोलिसांना माहित होतं हे प्रकरण तापलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रकरणात गृहमंत्र्यांनाही लक्ष घालावं लागलं होतं.

नितेश राणेंच्या वतीनेही तक्रार झाली होती. दोन्ही गुन्हे हे अदखलपात्र म्हणूनच नोंद झाले होते. NC म्हणजेच नॉन चार्जशीट असं त्या तक्रारीचं स्वरूप होतं. मात्र प्रकरणातली नावं हायप्रोफाईल होती कारण नितेश राणे हे मंत्र्यांचे चिरंजीव आणि आदित्य ठाकरे हे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंचे पुत्र. ही परिस्थिती हाताबाहेर जाता नये याची काळजी पोलिसांनी घेतली. त्या वादात पोलिसांनी कुणालाही झुकतं माप दिलं नाही. त्यावेळी दोन्ही नेते समोरासमोर आले होते. वरळीत त्यावेळी तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी सामंजस्याने हा प्रश्न दोन्ही नेत्यांची समजूत घालून सोडवला.

2011 पर्यंत वडिलांपर्यंत सीमीत असलेल्या राजकारणातलं वैर हे पुढच्या पिढीतही झिरपलं त्याची ही नांदी ठरली. हा संघर्ष जो दहा वर्षांपूर्वी सुरू झाला तो अजूनही सुरू आहेच. नितेश राणे अनेकदा आदित्य ठाकरेंवर टीका करताना दिसतात. नाव न घेता त्यांची नक्कलही करताना दिसतात. त्यामुळे यांचात जो वाद सुरू झाला आहे तो न संपणारा आहे हेच आत्ताही पुन्हा महाराष्ट्राने अनुभवलं.

राजकारणातल्या घराणेशाहीबद्दल नेहमी चर्चा होतात. ज्या प्रमाणे पदं पुढच्या पिढीकडे दिली जातात त्याचप्रमाणे राजकीय वैर किंवा संघर्ष हेदेखील पुढच्या पिढीकडे पोहचतं हेच हा किस्सा सांगतो आहे. नितेश राणे विरूद्ध आदित्य ठाकरे यांच्यात नुकताच जो संघर्ष झाला होता त्यानिमित्ताने हे सगळं सुरू कसं झालं त्याची ही एक आठवण आहे.

    follow whatsapp