अमरावती : माजी आमदार, नेत्यांकडून अवहेलना; काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंची पोस्ट चर्चेत

मुंबई तक

• 04:32 AM • 27 Sep 2022

अमरावती : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नुकत्याच पार पडलेल्या अमरावती दौऱ्यावेळी अनुपस्थित असलेल्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तसेच त्या काँग्रेसपासून लांब गेल्या असल्याचेही बोलले जात होते. मात्र आता त्यांनी याबाबत सविस्तर फेसबुक पोस्ट करुन खुलासा केला आहे. अमरावतीमध्ये त्यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत. गतवर्षी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी आमदार […]

Mumbaitak
follow google news

अमरावती : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नुकत्याच पार पडलेल्या अमरावती दौऱ्यावेळी अनुपस्थित असलेल्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तसेच त्या काँग्रेसपासून लांब गेल्या असल्याचेही बोलले जात होते. मात्र आता त्यांनी याबाबत सविस्तर फेसबुक पोस्ट करुन खुलासा केला आहे. अमरावतीमध्ये त्यांच्या नाराजीच्या चर्चा आहेत.

हे वाचलं का?

गतवर्षी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी आमदार सुनिल देशमुख आणि इतर स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्याकडून अवहेलना होत असल्याचा आरोप करत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. याबाबत आपण वरिष्ठांनाही वेळोवेळी अवगत केले असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याबाबतही कोणी आपल्याला निमंत्रणच दिले नसल्याचा उल्लेख त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. अमरावतीत यावरून चर्चा रंगल्या आहेत.

सुलभा खोडके यांची फेसबुक पोस्ट :

दिनांक २५ व २६ सप्टेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीकरिता प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले अमरावतीत आले होते. परंतु मी त्यांची भेट घेऊ शकले नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. त्यांच्या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमामध्ये मी हजर नव्हते. याबद्दल सुद्धा मी स्वतः खेद व्यक्त करते.

माझं त्यांच्या दौऱ्यामध्ये उपस्थित न राहण्याचे कारण म्हणजे भाजपाचे माजी आमदार यांनी १८ जून २०२१ ला काँगेस पक्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आजपर्यंत मला स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही बैठकीला बोलाविण्यात आले नाही. तसेच महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्या दोन दिवसाच्या अमरावती दौऱ्यासंदर्भात सुद्धा शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांनी मला कुठलेली निमंत्रण कळविले नाही.

यापूर्वी देखील मी या संदर्भात मुंबईला माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात, माननीय अशोकराव चव्हाण यांना अवगत केले आहे. माझ्या मतदारांमध्ये व अमरावतीच्या जनतेमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून मी हे पत्रक काढले आहे.

अमरावती दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, तो आमचा काँग्रेस पक्षातील अंतर्गत विषय असून तो आम्ही बसून सोडवू अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. याबाबत मी त्यांचे आभार मानते. त्यांच्याच पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीमधील काही महानगर पालिकेचे नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नव्याने प्रवेशित नगरसेवकांच्या आगामी उमेदवारीबाबत सुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सांगितले कि, स्थानिक स्तरावर कोणतीही उमेदवारी दिली जाणार नाही. या संदर्भात प्रथम शहराध्यक्षांकडे सर्वजण अर्ज करतील व नंतर आम्ही सर्व्हे करून व मेरीट नुसारच उमेदवारी देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली. याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते.

मनपा नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य असो की विधानसभा असो हे काँग्रेस पक्षाचे धोरणच आहे की, स्वतंत्र यंत्रणेमार्फत सर्व्हे करून उमेदवारी देण्याचे. याचा पुनरोच्चार सुद्धा त्यांनी केला. त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार व अभिनंदन करते. मी या पत्रकाद्वारे पुन्हा सांगू इच्छिते की, पुढील आठवड्यात मी मुंबई मध्ये महाराष्ट्राचे काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात, माननीय अशोकराव चव्हाण, काँग्रेस महाराष्ट प्रभारी व इतर नेते यांची मंबई येथे भेट घेऊन मी माझी भावना मांडणार आहे.

तसेच नजीकच्या काळात दिल्ली येथे जाऊन माननीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी व इतर जेष्ठ नेत्यांची भेट घेऊन अमरावतीच्या काँग्रेसमधील माझी अवहेलना होत असल्याबाबत अवगत करणार आहे. मी आजपर्यंत कधीही काँग्रेस पक्षाची विचारधारा सोडून कोणत्याही पक्षात गेली नाही.

मी वर्ष २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. माननीय सोनियाजी गांधी यांनी आपल्याला उमेदवारी दिली , पक्षाच्या तिकिटावर व पंजाच्या चिन्हावर २०१४ मध्ये बडनेरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती, अवघ्या पाच हजार मतांनी माझा पराभव झाला.

तसेच वर्ष २०१९ ला पुन्हा काँग्रेस पार्टीकडूनच अमरावती मतदार संघातून निवडणूक लढवीत विजयी झाले, भाजपच्या उमेदवाराचा तब्बल २० हजार मतांनी पराभव केला. काँग्रेस पार्टीने दोनवेळा उमेदवारी दिल्या बद्दल माननीय सोनियाजी गांधी व इतर जेष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करते.

त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्ये आहे, तसेच पक्षामध्येच राहिल व काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस नेत्या माननीय सोनियाजी गांधी आणि वरिष्ठ नेते यांनी पक्षात काम करण्याची संधी दिली, त्यामुळे माझे काम पाहून ते पुढेही मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देतील, असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे.

  • सौ. सुलभाताई संजय खोडके, काँग्रेस आमदार, अमरावती विधानसभा मतदार संघ

    follow whatsapp