मुंबईकरांच्या करोनाविरोधी लढ्याला मोठं यश; मुंबई झाली ‘कंटेनमेंट झोन फ्री’

मुंबई तक

• 03:28 PM • 15 Aug 2021

दोन वर्षांपासून करोनाविरोधात लढा देणाऱ्या आणि विषाणू उपद्रवाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. धारावीचा धडा गिरवत मुंबईकरांनी करोनाविरोधी लढ्यात मोठं यश मिळवलं आहे. मुंबई कंटेनमेंट झोन फ्री (Containment Zone Free Mumbai) झाली आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबईत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः दुसऱ्या लाटेत मुंबईत भयावह स्थिती निर्माण […]

Mumbaitak
follow google news

दोन वर्षांपासून करोनाविरोधात लढा देणाऱ्या आणि विषाणू उपद्रवाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. धारावीचा धडा गिरवत मुंबईकरांनी करोनाविरोधी लढ्यात मोठं यश मिळवलं आहे. मुंबई कंटेनमेंट झोन फ्री (Containment Zone Free Mumbai) झाली आहे.

हे वाचलं का?

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबईत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः दुसऱ्या लाटेत मुंबईत भयावह स्थिती निर्माण झाली होती. कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्यानं आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण आला होता. त्याचबरोबर ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्नही सुरूवातीला निर्माण झाला होता. मात्र, कोरोनाच्या दोन्ही लाटांवर मात करत मुंबई पुन्हा पूर्वपदावर येताना दिसत आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना मोठी गुड न्यूज मिळाली. मुंबईतील रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर गेला असून, रुग्णसंख्या दुप्पटीचा वेगही १८६० दिवसांवर गेला आहे. याचा परिणाम कंटेनमेंट झोनवरही झाला आहे. मुंबईतील सर्व कंटेनमेंट झोन हटवण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही माहिती दिली. ‘माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा दिवस आहे. आम्ही शहराला शून्य कंटेनमेंट करण्याच्या दिशेनं काम करत आहोत आणि आज आम्ही आमचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे’, असं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.

‘आपल्या सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे सर्वानीच कोविड नियमावलीचं पालन करणं आणि त्याप्रमाणेच वर्तन करणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या नियमांचं नागरिकांना पालन करणं आवश्यक असल्याचंही इक्बाल सिंह चहल म्हणाले.

आदित्य ठाकरेंनीही केलं ट्वीट

शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला. शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ९.५२ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे. तर, १.५१ लाख मुंबईकरांचं लसीकरण झालं. आजघडीला मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. असं असलं तरी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, लस घ्यावी आणि सुरक्षित रहावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

    follow whatsapp