Shiv Sena: …तरीही दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, विनायक राऊतांनी क्लिअर सांगितलं

मुंबई तक

• 11:07 AM • 15 Sep 2022

राकेश गुडेकर, प्रतिनिधी रत्नागिरी: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, शिंदे सरकारने काळी मांजरं सोडण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी हा मेळावा रोखण्याचं धाडस कोणीही करू नये, शिवतीर्थावरील मेळाव्याचा अधिकार शिवसेनेचाच आणि उद्धवजी ठाकरे यांचाच असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार विनायक राऊत काय म्हणाले? ”गद्दारांच्या गटाने […]

Mumbai Tak
Google CTA

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

हे वाचलं का?

रत्नागिरी: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, शिंदे सरकारने काळी मांजरं सोडण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी हा मेळावा रोखण्याचं धाडस कोणीही करू नये, शिवतीर्थावरील मेळाव्याचा अधिकार शिवसेनेचाच आणि उद्धवजी ठाकरे यांचाच असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार विनायक राऊत काय म्हणाले?

”गद्दारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात पलटी मारलेली आहे. चिन्ह गोठवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे, त्यामुळे औट घटकेचा त्यांचा खेळ संपत आलेला आहे. गद्दारांनी राजीनामे द्यावेत, आणि हिम्मत असेल तर विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्या, पण पळकुटेपणाचं धोरण या ईडी सरकारने अवलंबलं आहे अशी टीका विनायक राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.

सदानंद चव्हाण सांगूनही ऐकले नाहीत- विनायक राऊत

शिंदे गटात गेलेल्या माजी आमदार सदानंद चव्हाण यांना जेवढं समजावून सांगता येईल तेवढं सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही… आता जिथे गेलात तिथे सुखासमाधानाने राहा असं म्हणत राऊत यांनी सदानंद चव्हाण यांच्यावर निशाणा साधला, तसेच ज्यांची हकालपट्टी झाली आहे अशांची नावं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत.

वेदात-फॉक्सकॉनबद्दल विनायक राऊत काय म्हणाले?

वेदांता प्रकल्पाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, जो प्रकल्प आणण्यासाठी उद्धवजी ठाकरे सरकारने जी मेहनत घेतली, त्यावर पाणी फेरण्याचं काम या शिंदे सरकारने केलेलं आहे. अत्यंत नीचवृत्तीचं काम या सरकारने केलेलं आहे, शिंदे सरकारचा बोलविता धनी भारतीय जनता पक्षच आहे. शिंदे सरकार हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेलं सरकार आहे. हे भविष्याकरिता घातक ठरणार आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा सूड उगवण्याचं काम केलेलं आहे. तसेच प्रकल्प देऊ हे फक्त महाराष्ट्राला दाखवलेलं गाजर असल्याचंही राऊत म्हणाले.

रिफायनरीला विरोधकांशी सरकारने सुसंवाद साधावा- राऊत

रिफायनरीबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, राज्यसरकारचं कर्तव्य आहे की तो प्रकल्प चांगला असेल तर स्थानिक जे विरोध करताहेत त्यांना बोलावून त्यांच्याशी सुसंवाद साधायचा काम तर सरकारला करावंच लागेल, नसते उद्योग करण्यापेक्षा हे उद्योग करा ते फायदेशीर ठरतील. आम्ही जनतेला नक्कीच सांगू की सरकार जे सांगतंय ते ऐकून घ्या, किंवा सरकारच्या प्रयत्नाला खीळ घाला असं नक्कीच सांगणार नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.