वेदांताची इनसाईड स्टोरी सांगत माजी मंत्री सुभाष देसाईंचा फॉक्सकॉनवरून सरकारवर गंभीर आरोप

मुंबई तक

• 12:17 PM • 14 Sep 2022

फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून प्रचंड टीका केली जाते आहे. विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. अशात माजी मंत्री सुभाष देसाई यांनी इनसाईड स्टोरी सांगत सरकारवर टीका केली आहे. तसंच केंद्र सरकार सहकार्य करणार म्हणालं होतं मात्र त्यांनी सहकार्य न केल्यानेच हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला अशीही टीका सुभाष देसाई त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी केली आहे. काय […]

Mumbaitak
follow google news

फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून प्रचंड टीका केली जाते आहे. विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. अशात माजी मंत्री सुभाष देसाई यांनी इनसाईड स्टोरी सांगत सरकारवर टीका केली आहे. तसंच केंद्र सरकार सहकार्य करणार म्हणालं होतं मात्र त्यांनी सहकार्य न केल्यानेच हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला अशीही टीका सुभाष देसाई त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे सुभाष देसाई?

या प्रकल्पासंदर्भातला MoU २०१५ ला झाला होता. त्यावेळी तैवानहून त्यांचे अध्यक्ष आले होते. अनेक नेत्यांच्या बैठका त्यावेळी झाल्या होत्या. गेल्या वर्षे-दीड वर्षापासून जो प्रकल्प आणि ज्याची चर्चा सुरू आहे त्याचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. हा प्रकल्प सेमी कंडक्टर्सचा आहे. जो आता गुजरातला गेला आहे.

काय आहे दावोसची इनसाईड स्टोरी?

वेदांताचे अनिल अग्रवाल यांना आम्ही मे महिन्यात दावोसमध्ये भेटलो. त्यानंतर २४ जूनला दिल्लीला जाऊन फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिव्ह आणि त्यांचे सहकारी विन्सेंट ली यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आम्ही त्यांना निमंत्रण दिलं की आपलं समाधान झालं आहे त्यामुळे तुम्ही मुंबईत येऊन MoU करावा हे सांगितलं. २४ जूननंतर आमचं सरकारच राहिलं नाही. त्यामुळे अॅक्टिव्हली काही करावं अशी परिस्थिती नव्हती. ज्या तारखा सांगितल्या त्यातला २६ जुलै हा दिवस महत्त्वाचा आहे.

२६ जुलैला काय घडलं?

२६ जुलैला फॉक्सकॉनचं एक मोठं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं. त्या सविस्तर चर्चेनंतर एक चांगलं प्रसिद्धीपत्रक सरकारने अधिकृपणे प्रसारित केलं. त्याच्या सगळ्या बातम्याही माध्यमांनी दिल्या. १ लाख ६९ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येते आहे, तळेगाव आणि नागपूरमध्ये बुटी बोरी येथे हा प्रकल्प होणार आणि १ लाख रोगजार निर्मिती होईल असे ढोल बडवण्यात आले. त्यावेळी महाविकास आघाडीची काय उणीव झाली? प्रयत्न कुठे कमी पडले याचा कुठेही उल्लेख केला नाही. या प्रकल्पाला केंद्र सरकारचं सहकार्य मिळतं आहे असंही सांगितलं गेलं. आता जे बोललं जातं आहे ते कातडी बचाव धोरण आहे असंही सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रासाठी चांगला असलेला प्रकल्प अगदी शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातून गुजरातला गेला. महाराष्ट्रातल्या तरूण-तरूणींना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी गेल्या असंही सुभाष देसाई यांनी म्हटलंय. मला भीती अशी वाटते की असेच प्रकल्प जात राहिले की हे नेभळट सरकार आहे ते सरकार काहीही बोलणार नाही. माझं अजूनही आवाहन आहे की महाराष्ट्रात हा प्रकल्प येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत असंही सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp