पत्नीने विहिरीत, तर पतीने झाडाला गळफास घेत संपवलं आयुष्य; शेतकरी दाम्पत्याचं टोकाचं पाऊल

मुंबई तक

• 05:54 AM • 04 Dec 2021

औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपळदरी (ता. सिल्लोड) येथील शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी (3 डिसेंबर) सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पत्नीने विहिरीत उडी घेऊन, तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. सततच्या नापिकीला कंटाळून दाम्पत्याने आत्महत्या केल्याची चर्चा केली जात आहे. या दाम्पत्याला 13 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपळदरी (ता. सिल्लोड) येथील शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी (3 डिसेंबर) सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पत्नीने विहिरीत उडी घेऊन, तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. सततच्या नापिकीला कंटाळून दाम्पत्याने आत्महत्या केल्याची चर्चा केली जात आहे. या दाम्पत्याला 13 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी अशी दोन अपत्य आहेत.

हे वाचलं का?

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील ज्योती सदानंद गव्हाणे (वय 32) या विवाहितेने सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घराच्या शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्यानंतर या घटनेला काही मिनिटं होत नाही, तोच व्ह्यू पॉईंट रस्त्यालगत असलेल्या स्वतःच्या शेतात विवाहितेच्या पतीचा आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. सदानंद गुलाबराव गव्हाणे (वय 39) असं मयत महिलेच्या पतीचं नाव आहे.

सदानंद गव्हाणे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी खाली उतरवून त्यांना उपचारासाठी सिल्लोड घेऊन निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच साह्ययक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, उपनिरीक्षक कैलास पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांच्या मदतीने शेतकऱ्याच्या पत्नीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर दाम्पत्याचे मृतदेह शव शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अजिंठा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. सततच्या नापिकाला कंटाळूनच पती-पत्नीने टोकाचं पाऊल उचल्याची चर्चा गावात केली जात आहे.

दोन्ही मुलं झाली पोरकी

आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याला एक 13 वर्षांचा मुलगा व 8 वर्षांची मुलगी आहे. एकाच वेळी आईवडील सोडून गेल्यानं दोघांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नकळत्या वयात दोन्ही मुलं पोरकी झाल्यानं ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp